Public sentiment and politics : सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली म्हणून काय झालं ?

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली म्हणून काय झालं ? यांसदर्भात पत्रकार सोनाली शिंदे यांचा लेख

Update: 2026-02-02 08:43 GMT

Sunetra Pawar's oath-taking ceremony controversy अजित पवारांचा २८ जानेवारीला विमान अपघातात धक्कादायक मृत्यू झाला. महाराष्ट्र सुन्न झाला. अजून महाराष्ट्र सावरत नाही, तोच चौथ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. याने नेमके काय झाले?

यावर विरोधी व बाजूने अनेक भूमिका लोकांकडून मांडल्या जात आहेत. माझी काहीशी वेगळी भूमिका आहे. सुतक सुटलं नाही तर एवढी घाई कशाला, वगैरे माझे मत नाही. पण एका वाक्यात सांगायचं झालं तर ‘या प्रकारामुळे सर्वसामान्य माणसाचा राजकारणाशी कधी नव्हे तो तयार झालेला कनेक्ट तुटला!' आपलं वाटणारं राजकारण, आपले वाटणारे लोकप्रतिनिधी ही भावना अनेक दिवसांनी तयार झाली होती. ती कुणीतरी कानाखाली मारावी अशा पद्धतीने तुटली.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय चिखल झालाय. निवडणुकांमुळे तर हा चिखलही खोलवर गुंतागुंतीचा झाला. सर्वसामान्य माणसाने राजकारणापासून स्वत:ला तोडले. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान अनेक लोकांशी बोलणं झालं. लोक वैतागले आहेत. कोणाची कोणाशी युती, हे समजणं अवघड झालंय. त्यात ऐनवेळी ठरणारे उमेदवार, ऐनवेळी उमेदवारांचे बदलणारे पक्ष या सगळ्याने तर या वैतागात आणखीच भर पडली. निवडणुका नकोत, पण राजकारण थांबवा, अशी भावनाही काहींची तयार झाली. सुसंंस्कृत राजकारण पाहिलेल्या या राज्याने कधी नव्हे, तो इतका केऑस पाहिला. क्षणक्षणाला घडणारे राजकीय बदल, राजकीय धक्के याने माणूस तणावग्रस्त झाला. राजकारणाचा विचारही नको, चर्चा नको नि काहीच नको.

अशात, अजित पवारांची ही घडलेली दुर्घटना. महाराष्ट्र सुन्न झाला. पुन्हा राजकारणाने महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनाचा तळ गाठला. लोकांनी घरची कार्यं रद्द केली. नियोजित कौटुंबिक, व्यक्तिगत कार्यक्रम रद्द केले. सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. दिवसभर मध्ये-मध्ये मन भरुन येत होते. मधला सर्व वाईट पट विसरुन लोक पूर्वीच्या राजकीय वातावरणाच्या, लोकप्रतिनिधींच्या संदर्भात ट्रान्समध्ये गेले. हे सर्व आपोआपच घडले. घराघरातील बाया, पुरुष ढसढसा रडले. अगदी काही न समजणाऱ्या लहान मुलांची सुकलेले चेहरे मी पाहिलेले आहेत. काय घडलं, त्यांना माहिती नाही. पण काहीतरी भयंकर घडले, हे त्यांना समजत होते.

अशात पुन्हा टोचणारी, बोचणारी राजकीय वक्तव्यं येऊ लागली. त्यात भरीस भर म्हणून सुनेत्रा पवारांची शपथ ! यामुळे या घटनेमुळे स्तब्ध झालेली जनता ‘राजकारण लय वंगाळ’ म्हणत याकडे पाठ फिरवून पुन्हा आपापल्या कामांकडे वळाली. कधी नव्हे ते, सर्वसामान्य जनता राजकारणाशी कनेक्ट झाली असताना जणू आपणच त्यांच्या कानशिलात लगावून त्यांना परत पूर्वपदावर पाठवल्याची परिस्थिती.

मान्य आहे. आणखी काही दिवस गेले असते, तर मध्ये-मध्ये काही फाटे फुटले असते. काय फाटे फुटले असते, तर जाणकारांचे म्हणणे आहे की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या दृष्टीने काही हालचाली झाल्या असत्या किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासमोर अजित पवारांसोबत गेलेल्यांचे काही चालले नसते. काहीजण टोकाची शक्यता वर्तवतात की, उपमुख्यमंत्रिपदी वरीलपैकी कुणीतरी गेले असते तर? मला या सगळ्या शक्यता चुकीच्या वाटतात. हे शक्यच नाही. कदापि नाही. आणि, जरी काही झाले असते, तरी जनतेच्या भावनेपुढे काहीच करता आले नसते. अगदी अप्रिय राजकीय बदल झाले असते, तर लोकांनी नेतृत्वावर चिखल फेकायला कमी केला नसता, असे मला वाटते. लोकभावनेची लाट अतिशय तीव्र होती. आताही काही प्रमाणात आहे.

लोकभावनेच्या जोरावर सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री करता आले असते.

अशी दुर्घटना शत्रूसोबतही घडू नये. पण माफ करा, असे जर इतर एका मोठ्या राष्ट्रीय पक्षातील कुणासोबत घडले असते, तर त्यांनी ही लोकभावना व्यवस्थित तयार होऊ दिली असती. त्याचा फायदा घेऊन योग्य ते निर्णय घेतले असते. पण इथे हेच चुकलं. लोकभावना, लोकांशी भावनिक नातं या बाबतीत सर्वच गंडलंय. हा मोठा सविस्तर विषय आहे.

आणखी एक मुद्दा. काहीजण उदाहरण देतात, इंदिरा गांधींच्या निधनानंतर भरलेल्या पंतप्रधानपदाच्या जागेचं. तेव्हाची तत्परता व आताच्या परिस्थितीतील तत्परता याची तुलनाच कशी होऊ शकते? ते देशाचं पंतप्रधानपद होतं. संविधानिक पद होतं. देशाच्या कारभाराला जागेवर खीळ बसली होती. इथे अशी परिस्थिती कुठे आहे? मुळात हे पद वेगळं आहे. राज्याला मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यंत्री आहेत. काय अडलं होतं?

राहिला प्रश्न अर्थ खात्याचा. बजेट तोंडावर आहे. पण सुनेत्रावहिनींना अर्थखातं तसंही दिलेलं नाहीये. शक्यही नव्हतं. मग अडलं काय होतं? जे अडलं होतं, असं सांगितलं जातंय, ते चुकीचं वाटतं. या सगळ्यात मला मोठं नुकसान, तयार झालेल्या लोकभावनेला बोथट करणं, हे वाटतं.


Tags:    

Similar News