महायुतीच्या ६८ बिनविरोध नगरसेवकांवर टांगती तलवार ? आयोगाचे चौकशीचे आदेश

Is the sword hanging over 68 unopposed corporators of the Mahayuti? Commission orders inquiry

Update: 2026-01-03 12:50 GMT

मुंबई : महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांच्या निवडणूकांची सध्या रणधुमाळी सुरुय. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या ही ६८ इतकी आहे. यापैकी बिनविरोध निवडून आलेले सर्वच नगरसेवक हे भाजप-शिवसेना युतीचे आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडून विरोधी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना धमकावून, प्रसंगी प्रशासकीय यंत्रणांचा वापर करुन त्यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं बिनविरोध नगरसेवकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील ७ ते ८ वर्षांपासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला होता. त्यानुसार १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच महायुतीचे तब्बल ६८ बिनविरोध नगरसेवक निवडून आले आहेत. याममध्ये भाजप ४४, शिवसेना (शिंदे) २२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २ अशा एकूण ६८ नगरसेवकांचा समावेश आहे. सत्ताधारी महायुतीकडून याठिकाणी विरोधी उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान, सोशल मीडियावरही नेटिझन्सनी याविरोधात टीका करायला सुरुवात केलीय.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा मुद्दा गांभिर्यानं घेत, याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या ६८ बिनविरोध नगरसेवकांच्या प्रभागामध्ये विरोधी उमेदवारांवर कुणी दबाव आणला होता का ? या दबावापोटी तर विरोधकांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले का ? या अनुषंगानंही निवडणूक आयोग चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच हे ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आले की नाही, हे आयोगाकडून स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आयोगाचा चौकशी अहवाल येईपर्यंत या ६८ बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. 

Tags:    

Similar News