Scholarship Exam Reform Demand : शिष्यवृत्ती परीक्षेच्या काठिण्य पातळीवरून वादंग !
Scholarship Examसाठी प्रश्नपत्रिका कोणाकडून तयार केली जाते? त्या तज्ज्ञांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा अनुभव आहे का? त्यांनी बालमानसशास्त्र, वयानुरूप आकलनक्षमता आणि अभ्यासक्रमाची मर्यादा यांचा विचार केला आहे का? अनेकदा वाक्प्रचार, म्हणी किंवा संदर्भ साहित्याबाहेरील प्रश्न विचारले जाण्याचे कारण काय? विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या क्षमतांची पडताळणी करणे अभिप्रेत आहे? वाचा भाऊसाहेब चासकर यांचा लेख
Class 5 scholarship exam unfair for average students इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही नेहमीच्या शालेय इयत्तेच्या परीक्षेसारखी नसून विद्यार्थ्यांच्या ‘उच्च दर्जाच्या बौद्धिक क्षमतेचा‘ ठाव घेणारी परीक्षा आहे, असे Maharashtra State Examination Council महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आल्याचे माध्यमांतून समजले. ही भूमिका तत्त्वतः योग्यच आहे, कारण ‘स्कॉलरशिप’ scholarship या शब्दातच गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्याचा आशय अंतर्भूत आहे.
मात्र प्रत्यक्षात पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर अशा काही जिल्हा परिषदांकडून सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाते आणि सेस निधीतून त्यांच्या शुल्काचीही तरतूद केली जाते. अशा परिस्थितीत ही परीक्षा केवळ गुणवंतांसाठी आहे, असे म्हणत प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी उंच ठेवली जाणे विसंगत आहे. शिक्षणशास्त्रीयदृष्ट्या सर्व विद्यार्थ्यांची क्षमता समान नसते, हे मान्य असताना, सर्वांना सक्ती करून त्याच वेळी गुंतागुंतीची प्रश्नपत्रिका देणे अनेक विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरते.
परीक्षा परिषदेच्या धोरणानुसार सोपे, मध्यम व कठीण अशा संतुलित प्रमाणात प्रश्न असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत बहुसंख्य प्रश्न मध्यमपेक्षा अधिक कठीण व काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते. परिणामी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपयशी ठरण्याची शक्यता वाढते. प्रश्नपत्रिका सेट करताना ३०, ४०, ३० हा फॉर्म्युला लक्षात घ्यायला हवा असा आग्रह यासाठी धरला जात आहे.
यामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. प्रश्नपत्रिका कोणाकडून तयार केली जाते? त्या तज्ज्ञांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा अनुभव आहे का? त्यांनी बालमानसशास्त्र, वयानुरूप आकलनक्षमता आणि अभ्यासक्रमाची मर्यादा यांचा विचार केला आहे का? अनेकदा वाक्प्रचार, म्हणी किंवा संदर्भ साहित्याबाहेरील प्रश्न विचारले जाण्याचे कारण काय? प्रमाणलेखन (प्रुफरीडिंग) तपासले नव्हते का? विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या क्षमतांची पडताळणी करणे अभिप्रेत आहे?
या सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची ठाम मागणी आहे. परीक्षा परिषदेने तज्ज्ञ समिती नेमून प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ यांची मते जाणून घ्यावीत. कारण एखादी परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याऐवजी मानसिक ताण व न्यूनगंड वाढवत असेल, तर तिचे पुनर्मूल्यांकन आवश्यक ठरते.
यापुढे अशा सर्व परीक्षांसाठी अभ्यासक्रम व संदर्भ साहित्य स्पष्टपणे जाहीर करणे, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न केवळ सामान्य ज्ञानापुरते मर्यादित ठेवणे, आणि इतर प्रश्न तर्काधारित असावेत, अशी अपेक्षा आहे. तसेच एक प्रयोग म्हणून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांकडूनच निर्धारित वेळेत ती सोडवून घेण्याची पद्धत अवलंबली, तर प्रश्नांच्या व्यवहार्यतेचे वस्तुनिष्ठ परीक्षण होऊ शकेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, हीच अपेक्षा.