Save Ecology, Save Humanology : निसर्गाचा विध्वंस का करतोय आपण ?
Save Ecology, Save Humanology वसुंधरेवर सुरू झालेल्या मानवी उत्क्रांतीपासून आपण म्हणजेच माणसाने लावलेले विविध शोध, त्यातील काही अविष्कारांमुळे झालेला विध्वंस, मानवी स्वार्थ, तथाकथित विकास यावर भाष्य करून पर्यावरणपूरक विकासाची नवी व्याख्या शिकवणारं हे नाटक नक्की पाहा..
पाच वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोना म्हणजेच कोविड-19 या महामारीने ताबा मिळवला होता. Covid-19 हा विषाणू संसर्गजन्य असल्याने आपण कोणी एकमेकांच्या संपर्कात येऊ इच्छित नव्हतो. या मनुष्यप्राण्याने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. प्राणी संग्रहालयात जसे प्राणी कैद असतात, तसाच माणूस कैद झाला होता आपापल्या घरात… आणि मग सुरू झाली या धरित्रीची म्हणजेच आपल्या healing process of the Earth पृथ्वीची हीलिंग प्रक्रिया.
या अवाढव्य पृथ्वीला आपण काय वाचवणार? ती स्वतःवर उपचार करण्यासाठी सक्षम आहे आणि तिने ते केलं. त्या दोन वर्षांच्या काळात अगदी बेमालूमपणे केलं. शेवटी काय, प्राणी, पक्षी, कीटक, जनावर यांच्याप्रमाणे माणूसही या पृथ्वीचंच आपत्य आहे. त्यामुळे तिला ठाऊक आहे, कोणाची कोणती कळ दाबली की तिला श्वास घ्यायला वेळ मिळेल.
आपण जर नीट आठवलं, तर त्यावेळी आपण कैद होतो आणि पशुपक्षी स्वतंत्र होते. कुठेही फिरत होते. जसं मानवाचा तथाकथित विकास सुरू होण्याआगोदर फिरत असतील तसं.
या दोन वर्षांच्या काळात ओझोनचा थर, जो आपल्या पृथ्वीला सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासून संरक्षण देतो त्याला पडलेली भगदाडे काही प्रमाणात भरून निघत असल्याची नोंद झाली. वातावरणातील नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात घटलं. कारण सगळ्या विध्वंसक कंपन्या बंद होत्या. त्या कंपन्यांच्या चिमण्यांतून, नाल्यांतून विषारी रसायन बाहेर पडत नव्हतं. त्यामुळे नद्या देखील स्वच्छ होऊ लागल्या होत्या. गंगा, यमुना यांसारख्या नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं दिसून आलं. अनेक शहरांमध्ये निळं आकाश पुन्हा दिसू लागलं. वृक्षतोड थांबल्याने हरितक्षेत्र वाढीस लागलं. एकंदरीत काय तर ही पृथ्वी मोकळा श्वास घेत होती.
मानव यादरम्यान काय करत होता? तर या पृथ्वीनेच दिलेल्या संसाधनांमधून, रसायनांमधून, विज्ञानाच्या माध्यमातून कोविड-19 या विषाणूवर औषध आणि लस निर्मिती करत होता. कधी एकदा औषधनिर्मिती होते आणि पुन्हा माणूस मोकळा श्वास घेऊ लागेल यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करत होता. एकीकडे पृथ्वी स्वतःला बरी करत होती… आणि दुसरीकडे माणूस स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होता.
ही लढाई होती अस्तित्वाची. दोघांचीही.
या लढाईत दोघेही यशस्वी झाले. पण माणूस काही सुधारला नाही. पुन्हा एकदा पॉज केलेला विध्वंस रिझ्युम केला. आपण आपल्याच देशात बघूयात ना, विकासाच्या नावाखाली आपल्याला गाजरं दाखवली जात आहेत. आपल्या करोडो रुपयांच्या करातून सगळीकडे मोठमोठ्या इमारती, मोठमोठे महामार्ग, मोठाले मेट्रो स्टेशन आणि इतर बरंच काही… सारं काही एकाच वेळेला सुरू आहे. आपल्या मुंबईचंच उदाहरण घ्या. एकाच वेळेला रस्त्याचं खोदकामही सुरू आहे, त्याच वेळेला त्या रस्त्यावरती मेट्रो स्टेशनचं कामही सुरू आहे आणि त्याच वेळेला त्याच रस्त्याच्या बाजूला भल्या मोठ्या इमारतीचं कामही सुरू आहे. या सगळ्यामुळे मुंबईची हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही. ज्यांना आधीपासून श्वसनाचे त्रास आहेत त्यांची तर अवस्था वाईट आहेच, पण ज्यांना नाहीत त्यांनाही आता श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत. हवेतील PM2.5 आणि PM10 कणांची पातळी धोकादायकरीत्या वाढल्याचे अहवाल वारंवार समोर येत आहेत.
या वसुंधरेने अनेक स्थित्यंतरांतून जात मनुष्यप्राणी श्वास घेऊ शकेल, राहू शकेल अशी स्थिती निर्माण केली… आणि आपण आज तिची काय अवस्था करून ठेवली आहे! म्हणजे बघा ना समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या भूभागाचं संरक्षण व्हावं याकरिता खारफुटीची जंगलं निसर्गतः तयार होती. चक्रीवादळं, भरतीच्या लाटा, किनारपट्टीची धूप यापासून संरक्षण देणारं नैसर्गिक कवच म्हणजे ही खारफुटी. पण विकासकामांसाठी जमीन अपुरी पडायला लागल्यावर आपण समुद्रात शिरकाव केला. भूखंड निर्माण केले. आणि आपल्या तथाकथित विकासासाठी निसर्गाने दिलेलं संरक्षण कवच खारफुटीच्या रूपाने आपण तोडून टाकत आहोत.
वायुप्रदूषण करून ओझोनचा थर विरळ होत चाललाय, जागतिक तापमानवाढ वाढते आहे… त्यात आता खारफुटीच्या कत्तलीची भर. किनारपट्टी अधिक असुरक्षित बनते आहे, समुद्राची पातळी वाढण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. आपण आतापर्यंत प्लास्टिक हा मानवाचा सर्वात भयानक शोध आहे असंच समजत होतो. प्लास्टिकचं विघटनच होत नाही हे कालपर्यंत भयावह सत्य होतं. परंतु या पृथ्वीने प्लास्टिकचं विघटन करू शकणारे सूक्ष्मजीव, एका प्रकारचं शेवाळ आणि बॅक्टेरिया निर्माण केल्याचे संशोधन समोर येऊ लागले आहे. म्हणजे निसर्ग अजूनही माणसाची चूक झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
निसर्ग हा कायम माणसाला भरभरून संसाधनं देत आला आहे आणि माणसाच्या या तथाकथित विकासाशी स्वतःला जुळवून घेत आला आहे. पण माणसाला कुठे थांबायचं हेच कळत नाहीये. स्वतःच्या निवाऱ्याची सोय भागवण्यासाठी जंगलं उध्वस्त करत चाललाय. जैवविविधता नष्ट होते आहे. प्राणी-पक्ष्यांचे अधिवास संपत चालले आहेत. प्राणी-पक्षी हे सगळं पाहून मनात म्हणत असतील, “अरे मानवा… तू खातोस किती? तुझी भूक तरी किती? तुला भस्म्या झालाय का?” हो! आपल्याला भस्म्याच झालाय. आपण इतर कोणत्याही जीवाचा विचार न करता केवळ आधाशासारखे निसर्गाला ओरबाडत चाललो आहोत. हा सर्वनाश दिसताना पृथ्वीचा होतोय असं दिसत असलं, तरी आपण स्वतःचीच कबर खोदत आहोत हेच आपल्या लक्षात येत नाहीये.
हे सारं कशासाठी? तर हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या धनदांडग्यांसाठी… राजकारणी पक्षनिधी, तथाकथित राजकीय ऑपरेशन्ससाठी या धनदांडग्यांच्या पैशावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचंही तोंड शिवलेलं असतं. पर्यावरणीय परिणाम अहवाल (EIA) कमकुवत करणं, नियम शिथिल करणं, प्रकल्पांना वेगवान मंजुरी देणं हे प्रकार वारंवार घडताना दिसतात.
आपण नेहमी सुट्टी लागली की कोकणात फिरायला जातो. कोकणातला निसर्ग आपल्याला प्रेमात पाडतो. पण मग याच निसर्गाच्या मुळावर उठून मोठमोठे अणुऊर्जा प्रकल्प आणले जातात. जैतापूरसारख्या प्रकल्पांवर स्थानिकांचा विरोध का आहे, याचा आपण कधी गंभीरपणे विचार करतो का? जीवघेण्या विषारी रसायनांचं उत्सर्जन करणाऱ्या (परदेशात निर्बंध असलेल्या) कंपन्यांना परवानगी दिली जाते, रेड कॅटेगरी उद्योग किनारपट्टीलगत उभे राहतात तेव्हा कोकणवासीयांसोबत आंदोलनांमध्ये आपण उभे का राहत नाही? राजस्थान मध्ये अरवली पर्वतरांगेच्या मुळावर हे सरकार आणि भांडवलदार उठल्यानंतर तिथे नागरिक पेटून उठले पण आपण त्यांना किती सोबत केली? मध्यप्रदेश मधील हसदेव च्या जंगलांचा सर्वनाश करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर तिथल्या आदिवासींनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आंदोलन केलं पण मग आपण त्यांच्यासोबत उभे राहिलो का?
मग ही लढाई कोणाची आहे? ही लढाई आपली आहे ! केवळ लाँग वीकेंडला एन्जॉय करण्यापुरतं निसर्गाला मर्यादित ठेऊन चालणार नाही. जर आता निसर्गासाठी आवाज उठवला नाही, रस्त्यावर उतरून लढाई लढलो नाही तर वीकेंड सोडा, श्वास घेण्यापुरताही निसर्ग उपलब्ध असणार नाही. आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन वायूची आवश्यकता असते. त्याचं रासायनिक सूत्रही आपल्याला ठाऊक आहे - O₂. आपल्याला त्याची कृत्रिम निर्मिती करता येते. पण म्हणून ऑक्सिजनसाठी आपण स्वावलंबी झालो आहोत का? नाही. पृथ्वीवर असणाऱ्या अब्जावधी लोकांना निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनशिवाय पर्याय नाही. ॲमेझॉन, कॉंगो, सायबेरिया, तसेच आपल्या सह्याद्रीसारखी जंगलं हीच खरी पृथ्वीची फुफ्फुसं आहेत.
मानवनिर्मित ऑक्सिजन जेव्हा उपचारादरम्यान वापरला जातो तेव्हा त्याच्या किंमती पाहून आपले खिसे रिकामे होतात. कोविडकाळात ऑक्सिजन टंचाई काय असते, हे आपण प्रत्यक्ष अनुभवलं. इतकी दुरावस्था आपण करून ठेवली आहे. या वसुंधरेवर अजून किती प्रकारची, कोणती रसायनं, कोणते सूक्ष्मजीव, कोणती नैसर्गिक चक्रं कार्यरत आहेत याचीही पूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाहीये. मग कशाच्या जीवावर आपण हा विध्वंस चालवला आहे?
जे सरकार अथवा भांडवलदार तथाकथित विकासाचं गाजर दाखवून ही निसर्गाची हानी करत आहेत ते स्वतः मात्र घरी, कार्यालयात एअर प्युरिफायर लावून लाखोंच्या किंमतीचा श्वास घेत आहेत. काही शहरांमध्ये ‘ऑक्सिजन बार’ ही संकल्पना आली आहे, पैसे देऊन शुद्ध हवा घेण्याची! आणि आपल्याला मात्र वाऱ्यावर सोडून दिलं जात आहे… प्रदूषणाला केवळ शासन, प्रशासन, भांडवलदार जबाबदार आहेत असं नाहीये, आपणही आहोत की! निसर्गाने इतकं सहज आणि मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून दिलेलं जीवन म्हणजे पाणी हे आपण आता विकत घेऊन पिऊ लागलो आहोत. ही आपल्याच विनाशाकडे केलेली सुरुवात नाहीये का?
हे पाणी आपण ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकत घेतो. का? तर निसर्गतः उपलब्ध असलेलं पाणी अशुद्ध आहे, असं आपलं म्हणणं असतं. पण मग हे पाणी अशुद्ध कोणी केलं, हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो आहोत का? जी नदी, जी धरणं, जे ओढे, तलाव आपल्याला पाणी पुरवतात. त्याच जलस्रोतांमध्ये आपण जाऊन आंघोळ करतो, गुरांना आंघोळ घालतो, आपले कपडे धुतो. कंपन्या नाल्यांच्या माध्यमातून त्यांचं सांडपाणी नद्यांमध्ये सोडतातच. औद्योगिक रसायनं, जड धातू, विषारी घटक मिसळतात पण आपण काय करतोय? आपणही त्यात भरच घालतोय.
मृतदेहांवर मृतदेह आपण नदीमध्ये सोडून देतोय. जी नदी आपल्याला पिण्याचं पाणी पुरवते त्याच नदीमध्ये विघटनासाठी तयार असलेलं शरीर आपण सहज पाण्यात सोडतो… आणि त्या पाण्याची गुणवत्ता खालावतोय. आपल्या सण-उत्सवांतील कचरा, निर्माल्य इतकंच काय, देवी-देवतांच्या मूर्ती देखील आपण या नदीच्या पाण्यात विसर्जित करतोय. Plaster of Paris, रासायनिक रंग, धातूंचे अंश हे सगळं जलप्रदूषण वाढवतंय, जलचरांच्या जीविताला धोका निर्माण करतंय. आपल्या बुद्धीला गंज लागल्यासारखं का वागतोय आपण? याचं कारण म्हणजे आपण केवळ शिक्षण घेतोय, ज्ञान अर्जित करतोय; पण शिक्षित अथवा साक्षर होत नाही आहोत. आपली चेतना जागृत झालेली नाहीये. आपलं रूपांतर जिवंत मुडद्यांमध्ये झालं आहे. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कलेचा अभाव असतो.
कला ही माणसाला खऱ्या अर्थाने साक्षर करते. त्याच्यामध्ये चेतना जागृत करते. म्हणूनच आदिवासी बांधव त्यांची लढाई लढताना एक गाणं कायम गात राहतात,
गांव छोड़ब नहीं,
जंगल छोड़ब नहीं,
माय माटी छोड़ब नहीं,
लड़ाई छोड़ब नहीं।
झारखंडचे ख्यातनाम लोकगायक आणि गीतकार पद्मश्री मधु मन्सूरी ‘हंसमुख’ यांची ही जगप्रसिद्ध रचना उगाच लोकांच्या मनामनात वसलेली नाही. हे गाणं आज आदिवासींच्या प्रत्येक लढाईचं प्रतीक बनलं आहे. हेच तर काम कलेचं आहे. कारण कला ही विद्रोही असते. कला आत्मसात करणारे कलाकार हे समाजाचा आरसा असतात. समाजातील सामाजिक प्रश्नांवर, पर्यावरणीय प्रश्नांवर सरकारला आपल्या कलेच्या माध्यमातून जाब विचारणं, हे कलाकारांचं कर्तव्य असतं. हे कर्तव्य आज किती कलाकार पार पाडत आहेत हा फार मोठा प्रश्न आहे.
पण एक चळवळ आहे - ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’!
रंगचिंतक मंजूल भारद्वाज यांची ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ ही नाट्यचळवळ मागील ३४ वर्षांपासून समाजातील विविध प्रश्नांवर नाट्यप्रस्तुती करून शासन-प्रशासनालाच नव्हे, तर समाजालाही प्रश्न विचारत आहे. भारतासह आशिया, युरोप, खंडांमध्ये या चळवळीच्या प्रस्तुती सादर झाल्या आहेत. आता ही चळवळ Save Ecology, Save Humanology! अशा घोषणांसह ‘The…Other World’ ही नवी नाट्यप्रस्तुती जगभर सादर करत आहे. वसुंधरेवर सुरू झालेल्या मानवी उत्क्रांतीपासून आपण म्हणजेच माणसाने लावलेले विविध शोध, त्यातील काही अविष्कारांमुळे झालेला विध्वंस, मानवी स्वार्थ, तथाकथित विकास यावर भाष्य करून पर्यावरणपूरक विकासाची नवी व्याख्या शिकवणारं हे नाटक आहे.
आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देणारं हे नाटक आहे. निसर्गाप्रती असलेलं आपलं प्रेम, आपलं कर्तव्य याची चेतना जागृत करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे नाटक करतं. आपला विवेक शाबूत ठेवून दैनंदिन व्यवहार करण्यासाठी सूचित करतं. निसर्गाचा विध्वंस करून ही हवा, हे पाणी, हे आकाश, ही मृदा कलुषित करून आपण त्याची परीक्षा का घेत आहोत? त्याचा संयम संपला की मग जो तडाखा मानवाला बसतो, त्यामध्ये नाश पावण्याखेरीज आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. याची उदाहरणं आपल्यासमोर आहेतच. सातत्याने मुंबईचं तुंबणं असो, उत्तराखंड-हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या अतिवृष्टी असो, महापूर असो वा दुष्काळ, उन्हाची लाट असो वा थंडीची लाट… आपण केलेल्या दुष्कृत्यांचेच हे परिणाम आहेत याचीच जाणीव हे नाटक आपल्याला करून देतं.
येणाऱ्या शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी, पिंपरी-चिंचवड येथे ही नाट्यप्रस्तुती सादर होणार आहे. आपल्याला शक्य असल्यास वसुंधरेवरील प्रेमाचा, निसर्गसंमत विकासावर आधारित नव्या जगाचा जागर घालणारी ही नाट्यप्रस्तुती आपण आवर्जून अनुभवायलाच हवी.
Nature, Earth, Ecosystem, Biodiversity, Human Impact, Development, Industrialization, Renewable Energy, Green Movement, Eco-Friendly