Ahmedabad Plane Crash : पायलटने जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केल्याने झाला !
गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, पायलटने जाणीवपूर्वक इंधन पुरवठा बंद केल्याने झाला असल्याचे समोर आल्याचे तुम्हाला कळले का ? वाचा लेखक समीर गायकवाड यांचा लेख
Ahmedabad Plane Crash गेल्या वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, पायलटने जाणीवपूर्वक Fuel Supply Cut Off इंधन पुरवठा बंद केल्याने झाला असल्याचे समोर आल्याचे तुम्हाला कळले का ?
गेल्यावर्षी जून महिन्यात अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात होऊन 260 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, या चौकशीदरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही घटना तांत्रिक दोषामुळे न होता पायलटने जाणूनबुजून घडवली असल्याचा अहवाल भारतीय तपास यंत्रणा तयार करत असल्याचा दावा इटालियन दैनिक कोरीएर डेला सेराच्या वृत्तातून केला आहे.
दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील दोन सूत्रांच्या हवाल्याने त्यांनी वृत्त दिलं आहे. इटालियन वृत्तपत्रात छापून आलेल्या या वृत्ताचे पडसाद आता भारतात उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय तपास यंत्रणांनुसार 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर झालेला अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता आणि अधिकारी आता त्यांचा अंतिम अहवाल तयार करण्याची तयारी करत आहेत. या तपासात अमेरिकन तज्ज्ञही मदत करत आहेत.
एअर इंडियाद्वारे चालवले जाणारे बोईंग 787 ड्रीमलायनर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या दुर्घटनेत एकूण 260 लोक मृत्युमुखी पडले. या अपघातात विमानातील एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, ज्या वैद्यकीय महाविद्यालयावर हे विमान कोसळलं, त्या महाविद्यालयातील विद्यार्थीही मृत पावले.
जुलै 2025 मध्ये भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात एका पायलटने इंधन नियंत्रण बंद केल्याच्या उल्लेख आहे. कारण, कॉकपिटचे व्हॉइस रेकॉर्डिंग समोर आले असून त्यात पायलटबरोबर झालेला संवाद ऐकू येतोय. “तुम्ही (इंधन) का कापले?” असं एका पायलटने विचारलं असता दुसऱ्या पायलटने म्हटलं, “मी तसे केले नाही!” दोघांपैकी एका पायलटने इंधन नियंत्रण स्विच बंद केले होते. यामुळे विमानाची शक्ती गेली आणि ते जमिनीवर कोसळले. कॅप्टन सुमित सभरवाल हे पायलट-इन-कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे सह-पायलट होते.
अंतिम तपास अहवालात वैमानिकांचे मानसिक मूल्यांकन आणि मानसिक आरोग्य देखरेखीबाबतच्या शिफारशींचा समावेश असण्याची अपेक्षा आहे. अपघाताबाबत सर्व शक्यतांचा अभ्यास करण्यात आला. तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या, तसंच, वैमानिकांकडून झालेल्या मानवी चुकांबाबतही निरिक्षण करण्यात आलं. अखेर, तपास यंत्रणांनी त्यांचं लक्ष कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विचवर केंद्रित केले. डिसेंबरमध्ये, AAIB मधील भारतीय तपास यंत्रणेचे अधिकारी वॉशिंग्टनला गेले होते. त्यांनी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या प्रयोगशाळांमध्ये विमानाच्या ब्लॅक बॉक्स डेटाचे पुनर्विश्लेषण केले. या प्रयोगशाळेत केबिन ऑडिओ रेकॉर्डिंगची सखोल तपासणी केली, असं सूत्रांनी सांगतिलं असल्याचे समोर येतेय.
ब्लॅक बॉक्स डेटानुसारही हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे, इंजिन इग्निशन आणि शटडाउन नियंत्रित करणाऱ्या स्विचच्या मॅन्युअल हालचालीकडे लक्ष वेधण्यात आले. अपघाताच्या वेळी, दोन्ही इंजिन बंद असल्याचे आढळून आले. या माहितीवर AAIB कडून शिक्कामोर्तब होताच अनेक नवे प्रश्न उभे राहतील ज्यांची उत्तरे कठीण असतील! अजित दादांच्या विमान अपघाताची तटस्थ यंत्रणेकडून चौकशी होणे महत्वाचे आहे, हे या दुर्घटनेच्या कारणमीमांसेच्या पार्श्वभूमीवर ठळक होते.
- समीर गायकवाड