वंचित बहुजन आघाडीतून एकूण 47 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागारांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे. असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
30 वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, १० वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि पक्षाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे. अशी प्रतिक्रया पातोडे यांनी दिली आहे.
काय म्हटलंय पातोडे यांनी?
विधानसभा निवडणुकीत व जिल्हा परिषद निवडणुकीत उघड उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणा-या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहर्ता तपासुन घेतली पाहीजे.पक्षाचा विश्वास संपला असता तर दोन्ही माजींची उघड बेईमानी यशस्वी झाली असती. स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सत्ता मिळाली नसती.त्यामुळे पक्षाची नव्हे तर दोन्ही माजींची विश्वासाहर्ता संपली आहे.
वंचित आता राज्या बाहेर विविध राज्यात एनआरसी, सीएए व एनपीआर विरोधी आंदोलन करीत आपल्या कक्षा रुंदावत आहे.
पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम ऊपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचित चे कार्यकर्ते सक्षम आहेत.ह्यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय विजनवासात आहेत, हा इतिहास आहे.दोन्ही माजींनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन व सवलती देखील स्वाभिमान पुर्वक सोडून दिल्या पाहीजे. अशी प्रतिक्रिया पातोडे यांनी दिली आहे.