वर्ध्यात ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे संजय राऊंचा संशय, काय म्हणाले राऊत ?

Update: 2024-04-26 05:38 GMT

राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा असून या टप्प्यामध्ये एकुण आठ मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या लोकसभेच्या निवडणूकीत प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर, इत्यादी उमेदवरांचे भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाच मतदारसंघापैकी वर्धा आणि यवतमाळ-वाशिममध्ये महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, सकाळी वर्ध्यात मतदानाला सुरुवात होताच तांत्रिक खराबी आल्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली आहे. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

दरम्यान टीका करताना संजय राऊत म्हणाले की, उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना होणार आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. दुसऱ्या टप्यात होणाऱ्या या आठ जागांवर भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फार संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूका जिंकतील हे मी आपल्याला वारंवार सांगतोय. आम्ही ३५ पेक्षा अधिक असा टार्गेट असा आकडा ठेवला आहे. आम्ही तेवढ्या जागा जिंकू या आठही जागांवर महाविकास आघाडी जिंकत आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अमरावती आणि वर्ध्यातील ईव्हीएमबाबत राऊत म्हणाले की, अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्यं होऊ शकतं. वर्ध्यातून भाजपाच्या पायाखालची वाळु सरकली आहे. उध्दव ठाकरे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात जाऊन आले. ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक खराबी येणे आणि सर्वसामान्य मतदाराला खोळंबवणे परिणामी मतदारांनी मतदानाला पाठ फिरवणे हा षडयंत्राचा भाग आहे. मग अचानक संध्याकाळी मशीन चालू होतात. आणि मग ज्यांना हव्या त्या झुंडी उभ्या राहतात. पण सकाळी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना निराश करून परत पाठवणे हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

Tags:    

Similar News