जगात आस्तिक-नास्तिक वाद अनादी काळापासून सुरु आहे. आजही त्यावर वेळोवेळी चर्चा होत असते. असे असंले तरी अशा वादविवादात न पडता देवावर श्रद्धा ठेऊन आपल्या कार्यात आनंद मानणारे खूप आहेत. तसेच देवावर विश्वास न ठेवता केवळ स्वतःवर विश्वास ठेऊन नवनिर्माणाची प्रेरणा वाहणारे देखील तेवढेच आहेत. आपलं आस्तिक असणं, नास्तिक असणं किंवा निरीश्वरवादी असणं हे सगळं बाजूला ठेवून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवण्याची शिकवण देणाऱ्या निष्काम कर्मयोगाची हीच तर खरी प्रेरणा. हाच प्रेरणेचा स्रोत भारतीयांना मदर टेरेसांच्या रूपाने चैतन्य देऊन गेला. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजच्या असहिष्णुतेच्या वातावरणात आवर्जून अभ्यासावा असाच आहे.
सातासमुद्रापार जन्मलेली बाई येशू ख्रिस्ताची मानवतावादी शिकवण घेऊन भारतात येते आणि भारताचीच होऊन जाते ही घटना सामान्य नक्कीच नाही. तत्कालीन परिस्थितीचा धांडोळा घेतला तर धार्मिक वृत्तीच्या मदर तेरेसांना भारतीय समाजात राहून कार्य करताना कुठल्या राजकीय,सामाजिक, धार्मिक आणि मानसिक परिस्थितून जावं लागलं असेल हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. वयाच्या अठराव्या वर्षी नन बनलेली ही बाई भारताला आपलं कार्यक्षेत्र निवडते. कलकत्ताजवळच्या एंटाली गावात शिक्षिका म्हणून काम सुरु करते. सलग १७ वर्षे शिक्षिका-मुख्याध्यापिका म्हणून भूमिका बजावते. भारताच्या एकूण समाजरचनेत अगदी खालच्या वर्गातून आलेल्या लहानग्यांना शिक्षणाची गोडी लावते हे विशेष. ही कॉन्व्हेंट शाळा होती. सहाजिक तेथे धार्मिक शिक्षण दिलं जायचं. ख्रिश्चन मिशनरीज धर्मप्रचारासाठीच भारतात कार्यरत होत्या हा तो काळ होता. अशा परिस्थितीत जेव्हा त्या शिक्षिका म्हणून काम करायच्या तेव्हा धार्मिक बाजूने कमी आणि मानवतेच्या अंगाने त्या अधिक काम करायच्या.यादरम्यान दुसरं महायुद्ध सुरु झालं होत. जपानने ब्रम्हदेश ताब्यात घेतलं आणि इंग्रजांना देखील पश्चिम बंगालात खबरदारी म्हणून लष्करी तळ उभारावं लागलं. त्यात मदर तेरेसांची शाळा अन्यत्र हलवली गेली. दरम्यान गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२ साली चाले जावं चळवळ जोर धरत होती. बंगाल तर स्वातंत्र्यसैनिकांची भूमी. राजा राममोहन रॉय ते सुभाषबाबू असा या मातीचा इतिहास. पाहायला गेलं तर धर्माच्या आधारे तेरेसांनी ब्रिटिशांना मदत करायला हवी होती. ब्रह्मदेशातून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायला हवं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडून दयायला हवं होत. पण त्यांनी तस काही केलं नाही. धर्मप्रचारासाठी जरी त्या भारतात आल्या असल्या तरी त्यांनी मानवतेलाच सर्वश्रेष्ठ मानलं. पुढे याची त्यांना किंमत चुकवावी लागली.
१६ ऑगस्ट १९४६ ला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगने 'प्रत्यक्ष कृती' कार्यक्रम सुरु केला. बंगालात हिंदू-मुस्लिम दंगली पेटल्या. रक्ताच्या थारोळयांनी कलकत्ता शहर माखलेलं असताना, शहरात दंगली उफाळून आलेल्या असताना आपल्या पदराखाली असलेल्या २०० अनाथांना सांभाळत असलेली ही मायमाऊली दंगलग्रस्तांना देखील मदत करत होती. पुढे १९४७ भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. इंग्रज देश सोडून गेले. भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. पण फाळणीमुळे देशाचं जनमानस बिघडलेलं होत. सीमाभागात दंगली पेट घेत होत्या. अशा वेळी मदर तेरेसांना देश सोडून जाणं सहजशक्य होत. पण इथेच त्यांचं वेगेळेपण पाहायला मिळत. त्या मिशनरीचं काम करत असल्या तरी मानवता या मूल्याला त्यांनी अग्रक्रम दिला. या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचं ठरवलं.
धर्मकार्यासाठी आलेल्या तेरेसांना लोकसेवा करण्याची संमती घ्यावी लागली. ही संमती थेट व्हॅटिकन चर्चमधून मिळवावी लागली. त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता त्यांना तशी संमती दिली गेली. शिक्षिका असलेल्या या बाईने भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आणि नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. हा त्याच्या जीवनातला दुसरा असा महत्वाचा टप्पा म्हणता येईल. क्षय,मलेरिया, कुपोषणग्रस्त, कुष्ठरोगी अशा समस्या असलेल्या वातावरणात हे काम हाती घेणं नक्कीच सोपं नव्हतं. त्यांची काम करण्याची जिद्द पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलंच, पण कर्मठ धर्मगुरूंनी टीकादेखील सुरु केली. तेरेसा यांनी ख्रिश्चन धर्माची शिकवण द्यावी, लोकांचे धर्मांतर करावे म्हणून त्यांना नेमण्यात आल्याची मिशनरींची धारणा होती. तर आपले काम हे देवाचे आणि धार्मिक सेवेचे आहे असं तेरेसांना वाटत होत. मिशनरी म्हणत, 'सिस्टर तेरेसा या धर्मोपदेशक आहेत', तर तेरेसा म्हणत , 'मी कर्मोपदेशक आहे'.
फिरते दवाखाने आज आपण आपल्या आसपास पाहतो आहोत. त्याची मूळ प्रेरणा आणि कल्पना ही मदर तेरेसांचीच. ज्या महारोग्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही, अशा रोग्यांपर्यंत स्वतः पोहचून सेवा देण्याचा त्यांचा यामागचा विचार होता. मदर तेरेसा म्हणत, 'जगातील सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे आपण नकोसे झाल्याची भावना' . आज जर त्या ह्यात असत्या तर काश्मीर प्रश्नावर नक्कीच व्यक्त झाल्या असत्या. काश्मिरी नागरिकांच्या मनात असलेली एकाकीपणाची भावना,न्यूनगंड त्यांनी जाणून घेऊन संवादाची सुरुवात नक्कीच केली असती.