राज्य सरकार आमच्या पत्रांची दखल घेत नाही, राज्यपाल आता तुम्हीच शासनाला निर्देश द्या : दरेकर

Update: 2020-05-23 01:34 GMT

राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यापासून विरोधी पक्षाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेत सरकाराला सहकार्य करण्याच्या उद्देश्याने ३० मार्च २०२० ते आज पर्यंत विविध विषयांवर लक्ष वेधण्यासाठी तब्बल २५ पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली पण दुर्दैवाने सरकारच्या पातळी वर एकाही पत्राची दखल घेतली नसल्याचा दावा विरोधी पक्ष नेते प्रविण दरकर यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना संबंधित विविध समस्या निवारण्यासाठी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत. अशी विनंती दरेकर यांनी राज्यपालांना केली आहे.

काय म्हटलंय पत्रात?

कोरोना हे वैश्विक संकट आहे याची आम्हालाही कल्पना आहे. हे संकट सुरु झाल्यापासून राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आदेश आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले. या संकटाच्या पार्श्वभुमीवर अधिवेशन मध्येच संपविणेपासून सर्वच मुद्यांवर आम्ही माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली राज्य शासनाला सहकार्य केले.

याच सहकार्याच्या भावनेतून दि. ३० मार्च २०२० पासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्य सरकाराला आजपर्यंत २५ पत्रे दिली असताना या पत्रांची नोंद घेतली गेली नाही. असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय?

दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याबाबत,शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणेबाबत,मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, परिचारीकांना PPE कीटस् / N-95 मास्क देणेबाबत, दैनंदीन मजुरीवर आयुष्य असलेल्या बलुतेदार बांधवांना पुढील ४ महिने आर्थिक मदत देणेबाबत,पोलीसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाविरुध्द देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याबाबत,रेशन व्यवस्थांमधील काळाबाजार थांबविणेबाबत,राज्याअंतर्गत प्रवशांना घरी जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था करणेबाबत,खाजगी रुग्णालये बंद असल्याने, ती सुरु करणेबाबत,मुंबईमधील रुग्णालयांमध्ये ICU बेडस् ची संख्या वाढविणेबाबत,पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे अकस्मात मृत्यूची चौकशी करणेबाबत,वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वेळेत मिळणेबाबत,शेतकरी / मजूर व शहरी भागातील दारीद्रय रेषेखालील कामकारांना सरसकट मोफत वीज देणेबाबत,बेस्ट कर्मचा-यांचा पगार वेळेवर होणेबाबत, मुंबई मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत, कोकणातील मच्छीमार / आंबा उत्पादक / काजु उत्पादकांनाही विशेष पॅकेज घोषीत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना या 25 पत्रामध्ये केल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे.

राज्य शासनाने वेळेत आम्ही केलेल्या सुचनांची दखल न घेतल्याने, आज महाराष्ट्रामध्ये ४० टक्के रुग्ण आहेत असा दावाही दरेकर यांनी केला आहे. राज्य सरकारची निष्क्रीयता व त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनास योग्य निर्देश द्यावेत अशी ही विनंती दरेकर यांनी पत्रात केली आहे.

Similar News