परतीच्या पावसाने केरळात हाहाकार ; वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 23 जणांचा मृत्यू

Update: 2021-10-18 03:36 GMT

नवी दिल्ली  : परतीच्या पावसाने देशभरात सर्वत्र दाणादाण उडवली आहे. राजधानी दिल्लीत काल रविवारी जोरदार पावासाने हजेरी लावली. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत केरळमध्ये तर पावसाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे, तिथे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये केरळमध्ये २३ जणांचा मृत्यु झाला. दरम्यान, महाराष्ट्राला देखील परतीच्या पावसाचा फटका बसला असून मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  

केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहा:कार उडवला असून दरडी कोळणे, भूस्खलन, महापूर अशा घटनांमध्ये राज्यभरात २३ जणांचा मृत्यू झाला. पुरामध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ व लष्कराने कोट्टयम जिल्ह्यातील कुट्टीकल व कोकयार भागात मदतकार्य सुरू केले. पावसाचा सर्वाधिक फटका इडुक्की व कोट्टयम या जिल्ह्यांना बसला आहे. कोट्टयम जिल्ह्यात १२ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. इडुक्की व आणखी काही भागांत ११ जणांचा बळी गेला.

मीनाचल व मणिमला या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. केरळातील बहुतांश धरणे पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. पुरात अडकलेल्यांना लष्कर, हवाई दल तसेच नौदलाच्या मदतीने बाहेर काढण्यासाचे काम सुरू आहे. वेळप्रसंगी एमआय-१७ व सारंग हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

Tags:    

Similar News