नारायण राणेंना मंत्रिमंडळातून काढा, पंतप्रधान मोदींना पत्र

Update: 2021-08-24 07:33 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगला आहे. ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राणेंवर अनेक ठिकामी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस राणेंच्या अटकेसाठी निघाले आहेत. हा सर्व वाद सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. "नारायण राणे यांनी आपल्या महाड येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली देण्याची भाषा वापरली. राणे आपल्या अशा भाषेतून समाजाला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत....असा प्रश्न मला पडला आहे. केंद्रीय मंत्रिपदाची मर्यादा सोडून असे वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांना मंत्रिपदावर राहण्याची कोणताही अधिकार नाही, असे मला वाटते. हा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी नम्र विनंती मी आपणास करतो"

असे विनायक राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.




 


Tags:    

Similar News