महाराष्ट्र भाजपचे डोके सरकले आहे का? - सामना

राज्यातील मंदिरं उघडण्याचे श्रेय घेणाऱ्या भाजप नेत्यांवर सामनामधून हल्लाबोल

Update: 2020-11-19 02:13 GMT

लॉकडाऊन अंतर्गत बंद असलेली राज्यातील मंदिरं खुली करण्यात आली आहेत. पण ही मंदिरं भाजपच्या आंदोलनामुळे खुली करण्यात आली असा दावा त्या पक्षाकडून केला जात आहे. पण आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात काय म्हटले आहे ते पाहूया....

एका वृत्तवाहिनीचा 'भुंकरा' अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या 'भुंकऱ्या'स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा 'बाजार' करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भाजपातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल. त्यांच्या मानेवर रिकामी मडकी आहेत, पण मडकी बनविणाऱ्या पांडुरंगभक्त गोरा कुंभाराच्या वंशजांनाही आम्ही श्रद्धेने नमस्कार करीत आहोत. पांडुरंगाचरणी महाराष्ट्र नेहमीच लीन झाला आहे. पांडुरंग महाराष्ट्राच्या मनात आहे.

भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपतील 'उपऱयां'नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले.

भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. ज्यांचा भाजपशी किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेशी काडीमात्र संबंध नव्हता असे बाजारबुणगे सत्तेसाठी भाजपमध्ये घुसले. ते उपरेच देवाच्या दारात श्रेयवादाचा गोंधळ घालीत आहेत. अशाने भाजपची पत वाढणार नसून ती उतारास लागत आहे याचे भान ठेवले नाही तर राज्यात त्यांचे हसे होईल.

Tags:    

Similar News