UP Sadhu Murder Case: महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका: योगी आदित्यनाथ

Update: 2020-04-29 00:59 GMT

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली.

ज्या प्रकारे राज्यात घडलेल्या पालघर घटनेत राज्य सरकारने कठोर कायदेशीर कारवाई केली, त्याचप्रकारे उत्तर प्रदेश सरकारही कारवाई करून दोषींना कडक शिक्षा करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मात्र, त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील’

असं म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. यावर योगी आदित्यनाथ यांनी

'संजय राऊत यांना संतांची हत्येवर चिंता व्यक्त करणं राजकारण वाटतं? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, कारण पालघरमधले साधू निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. राजकारण कोण करत आहे?' असा सवाल करत

'पालघरमध्ये झालेल्या संतांच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्याला राजकारण म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या दृष्टीबद्दल काय बोलणार? तुमचं हे वक्तव्य म्हणजे तुमच्या बदलत्या राजकीय संस्काराची ओळख करुन देत आहे. हे तुष्टीकरणाचं प्रवेशद्वार आहे, यात शंका नाही,'

'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बुलंदशहर घटनेनंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका',

असं ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

एकंदरीत उत्तर प्रदेश मध्ये बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप मधील राजकारण तापताना दिसत आहे.

Similar News