परमबीर सिंह कुठं आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा वकिलाला सवाल, सिंह यांना अटकेपासून संरक्षण नाहीच...

परमबीर सिंह कुठं आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा वकिलाला सवाल, सिंह यांना अटकेपासून संरक्षण नाहीच...

Update: 2021-11-18 10:17 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांना किल्ला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सिंह यांच्या वकिलांनी परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण द्यावं. म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यापुर्वी त्यांच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

'याचिकाकर्ते जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत? ते या देशात आहेत की देशाबाहेर गेलेत? याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे,' असं म्हणत न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी अनिल देशमुख यांच्या वकिलांची चांगलीच झाडाझडती घेतली.

यावर परमबीर सिंह यांच्या वकीलांनी सिंह यांना वाटल्यास ते समोर येतील. असं न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने

'तुमचा व्यवस्थेवर किती अविश्वास आहे ते पाहा. याचिकाकर्ते पोलीस आयुक्त होते. पण आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते भारतात प्रकट होतील, असं तुम्हाला म्हणायचं आहे का?', असा सवाल कौल यांनी केला आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून ते गायब आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. जर ते पुढील 30 दिवसात समोर आले नाही तर त्यांच्या मालमत्तेची जप्ती केली जाणार आहे.

सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा आरोप आहे. गोरेगाव पोलिस यावर तपास करत असून तीन वेळा वॉरंट देऊन देखील सिंह हजर झाले नाहीत. म्हणून त्यांच्यासह अन्य दोन आरोपी रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांना फरार गुन्हेगार घोषित करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने आज ही मागणी मान्य करत त्यांना फरार घोषित केले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती.

या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.

Tags:    

Similar News