Nagarpanchayat Election : बीड जिल्ह्यातील नगरपंचायतीवर पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का

बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीदरम्यान मुंडे बहिण भावामध्ये संघर्ष रंगल्याचे पहायला मिळाले. . मात्र बीड जिल्ह्यात भाजपाने नगरपंचायतींवर वर्चस्व राखत धनंजय मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे.

Update: 2022-01-19 09:12 GMT

राज्यातील नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजली. त्यातच बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे या निवडणूकीत बाजी कोण मारणार ही उत्सुकता लागली होती. तर बुधवारी 19 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीत भाजपाने वर्चस्व राखत धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे.

भाजपाने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूका लढवल्या होत्या. त्यात बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी चार नगरपंचायतींवर भाजपाने वर्चस्व राखले. तर एक नगरपंचायत राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील नगर पंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यात आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतीवर भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्चस्व मिळवले आहे. तर केजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. तर केज नगरपंचायतीत राष्ट्रवादी आणि शेकाप 5 , जनविकास आघाडी 8, आणि काँग्रेस 3 तर अपक्षाने एक जागा राखली. त्यामुळे राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यासह स्थानिक आघाडीने सत्ता राखल्याचे केजमध्ये चित्र आहे. मात्र केजचा निकाल काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

याबरोबरच आष्टी नगरपंचायतीमध्ये भाजपाने 13 जागा जिंकत एकहाती वर्चस्व राखले आहे. तर राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 यासह अपक्षाला 1 जागांवर समाधान मानावे लागले. तर शिरूर नगरपंचायतीत भाजपा 11, राष्ट्रवादी 4, शिवसेनेला 2 जागांवर विजय मिळाला. याबरोबरच पाटोदा नगरपंचायतीमध्ये भाजपने 9, भाजप पुरस्कृत 6 आणि महाविकास आघाडीने 2 जागा राखल्या. यासह आष्टी पाटोदा शिरूर नगरपंचायतीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली जाईल, असे म्हणत सुरेश धस यांनी विजयाचे श्रेय पंकजा मुंडे यांना दिले. तसेच वडवणी नगरपंचायतीत राष्ट्रवादी 6, भाजप 8, राष्ट्रवादी पुरस्कृत 3 उमेदवार विजयी झालेले आहेत.

या निकलावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा विजय जनतेचा आहे. तसेच नगरपंचायत एक झांकी आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती अभी बाकी है, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीही जिंकणार असल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा जिल्हयातील जनतेत असलेला मोठा रोष आणि आम्ही केलेली विकास कामे यामुळे जनतेनी आम्हाला पसंती दिली. सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असं पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

Tags:    

Similar News