विरोधकांचा गदारोळ, विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

Update: 2020-02-25 07:27 GMT

विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आणि राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

विरोधी पक्षातील महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर घोषणाबाजी केली. तसंच शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आणि महिला अत्याचाराबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सुरूवातीला १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुदद्यावर ठाकरे सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच कर्जमाफीबाबत जाहीर केलेली यादी अपूर्ण असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या वेगानं सरकारनं कर्जमाफी केली तर ४०० महिने लागतील, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून सरकार फसवणूक करत असल्याचं सांगत कर्जमाफीबाबत भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच आझाद मैदानावर निदर्शनं केली जाणार आहेत, तसंच राज्यपालांना बेटून यासंदर्भात निवेदनही देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले आहे.

Similar News