Budget 2022 : बजेटवरून विरोधकांचा हल्लाबोल, मोदी सरकारचे 'कुछ नहीं बजेट'

अर्थसंकल्पिय अधिवेशनात देशातील पायाभुत सुविधा, शेती, उद्योग, रोजगार यांच्यासाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या बजेटमधून निराशा झाल्याचे मत व्यक्त करत विरोधकांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टिका केली आहे. तर भारताचे कुछ नहीं बजेट अशा शब्दात काँग्रेसने बजेटवर हल्लाबोल केला आहे.

Update: 2022-02-01 08:55 GMT

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशभरातील शेतकरी, उद्योजक, युवक, मध्यमवर्ग, छोटे उद्योजक यांच्यासाठी या बजेटमध्ये काय तरतूदी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यातून साफ निराशा झाल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन केले तर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे समर्थन करताना म्हटले की, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक शक्तीशाली बनवणारा हा अर्थसंकल्प आहे. तर सर्वसामान्य माणूस, शेतकरी- कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. त्यामउळे अर्थसंकल्प मांडल्याबद्दल निर्मला सितारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी बजेटचे समर्थन केले तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बजेटवर कडाडून टीका केली. त्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने सादर केलेले बजेट हे शुन्यासारखे आहे. तर यामध्ये नोकरदारांसाठी काही नाही, मध्यम वर्गासाठी काही नाही, गरीब आणि मागास वर्गासाठी काही नाही, युवा, शेतकरी आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी काहीही नसल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांसह राज्यातील महत्वाच्या काँग्रेस नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकरे यांनीही बजेटवर जोरदार टीका केली. यावेळी यशोमती ठाकुर म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे. तर कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल आणि सवलत नाही. हे सरकार संवेदनशीलच नाही, असा आरोप यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना केला. तर सामान्य माणसांचा आवाज ऐकायचाच नाही, असं सरकारने ठरवलेले दिसत आहे, असे मत यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजेटचे वर्णन अर्थसंकल्प नाही तर निवडणूक संकल्प असे केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बजेटवर सडकून टीका केली. तर संजय राऊत म्हणाले की, मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवे असते. तर मोदी सरकारच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसते. यंदाचे बजेटही त्याच प्रकारचे आहे. त्यामुळे बजेटमध्ये सामान्य लोकांसाठी काहीही नाही. सरकार गरीबांचा किती गळा आवळणार आणि देशातील दोन चार लोकांना किती श्रीमंत करणार हे येणाऱ्या काळात पहायला मिळेल, असे मत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

Tags:    

Similar News