केंद्र सरकारनं देशभरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी ही संख्या ६०६च्यावर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या आतापर्यंत १० झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात २४ मार्च रोजी कोरोना रुग्णांची संख्या ५२९ होती ती २५ मार्च रोजी वाढून ६०६ झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळेच केंद्र सरकारनं लॉकडाऊन जाहीर केले आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानं बंद केली जाणार नाहीत हे केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी नागरिक विनाकारण गर्दी करत असल्याचं दिसतंय.