33 कोटी लृक्ष लागवडीची चौकशी होणार, अजित पवारांची घोषणा

फडणवीस सरकारच्या काळातील एका महत्त्वाकांक्षी उपक्रमात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Update: 2021-03-03 06:50 GMT

फडणवीस सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप काही आमदारांनी केला आहे. याच मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी विधिमंडळ सदस्यांची चौकशी समिती गठित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ही समिती 31 मार्च 2021 पर्यंत स्थापन केली जाईल असेही त्यांनी सांगितले. या समितीला सुरुवातीला चार महिने कालावधी दिला जाईल, या काळात काम पूर्ण झाले नाही तर आणखी दोन महिने दिले जातील आणि सहा महिन्यात हा अहवाल विधिमंडळात सादर केला जाईल असेही अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

वृक्ष लागवडीसंदर्भात काही आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी वनमंत्री म्हणून उत्तर दिले आहे. त्यानुसार 2016-17 ते 2019-20 या दरम्यान 2429. 68 कोटी निधी खर्च करून 28.27 कोटी वृक्ष लागवड केली आहे. यातील 75.63 टक्के रोपे ऑक्टोबर 2020 पर्यंत जिवंत आहेत असे या उत्तरात सांगण्यात आले आहे. पण जर मुख्यमंत्र्यांनी स्वत: लेखी उत्तर दिले असताना विधिमंडळ सदस्यांची चौकशी समिती गठीत करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News