खासदार संभाजी राजे आक्रमक, 26 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा

Update: 2022-02-16 08:12 GMT

मुंबई : खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. परंतू त्यावर आठ महिन्यानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे खासदार संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. तर त्यांनी 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेऊन मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र मागण्या मान्य करून आठ महिने उलटल्यानंतरही त्यावर कारवाई न झाल्याने 26 फेब्रुवारीपासून खासदार संभाजी राजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

संभाजी राजे यांनी पत्रात म्हटले आहे की, 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा आरक्षण रद्द झाले. त्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारकडे आम्ही काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर राज्य मंत्रीमंडळाने 17 जून 2021 रोजी निर्णय घेतला. या निर्णयानंतर आठ महिन्यानंतरही त्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई झाली नाही. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात संभाजी राजे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली.

खासदार संभाजी राजेंनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजेंना पाठींबा जाहीर केला आहे. तर भारतीय जनता पार्टी कायम मराठा समाजाच्या हितासाठी लढली आहे. या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेतला. त्यामुळे मराठा समाजासाठी छत्रपती संभाजी राजेंच्या उपोषणाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, तसेच आमचा पुर्ण पाठींबा आहे, असे म्हटले आहे.

Tags:    

Similar News