दुचाकी कशी चालवली त्यापेक्षा नगरपालिका कशी चालवली याचा विचार व्हावा- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

Update: 2021-10-13 02:51 GMT

सातारा  :  साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामधील तणाव संपूर्ण राज्याला माहिती आहे. शिवाय, अधूनमधून साताऱ्यात या दोघांच्या समर्थकांमध्ये होणाऱ्या वाद काही नवीन नाहीत. दरम्यान, आता पुन्हा एकदा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधल्याचे समोर आले आहे. सातारा शहरातील विकासकामांचे उदघाटन , पाहणी आणि भूमिपूजन करण्यासाठी रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शहरातून दुचाकी फेरी मारल्याने ते दिवसभर चर्चेत राहिले. कार्यकर्त्याची दुचाकी ताब्यात घेत त्यांनी राजपथासह शहराच्या विविध भागाची रपेट करत विकासकामांची उद्घाटने व पाहणी केली. दरम्यान यावरूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, "मी बघत होतो, वाचत होतो की शहरात बरेच नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटनांची भूमिपूजनांसाठी काहीजण गाडी घेऊन उद्घाटनाला गेले, काहीजण दुचाकी चालवत गेले. त्याचीही चर्चा झाली की ते दुचाकी चालवत गेले. माझं म्हणणं आहे की, पाच वर्षे नगरपालिका नीट चालवली असती, तर आता एवढी पोस्टरबाजी आणि एवढं सगळं करावं लागलं नसतं. दुचाकी कशी चालवली त्यापेक्षा आता मला वाटतं सातारकरांनी पाच वर्षे नगरपालिका कशी चालवली? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे." असं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.

उद्घाटन कार्यक्रमासाठी "जे काही पोस्टर, फ्लेक्स आपण लावलेले बघतो आहोत. याचा खर्च जर नगरपालिकेच्या तिजोरीतून झाला असेल, तर मला वाटतं की, एवढी पोस्टरबाजी करण्यापेक्षा तेवढ्या खर्चात एखादा रस्ता किंवा एखाद्या वॉर्डातील गटाराचं काम किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणाचं सुशोभिकरण झालं असतं. असा घणाघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. त्यामुळे जे चाललं आहे ती सगळी नौटकी आहे. आता निवडणुका नगरपालिकेच्या लागणार, जवळ आल्या आहेत. हातात दिलेली संधी निघून गेलेली आहे, हे आता सत्तारूढ आघाडीच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता हे सगळं परत पुढील पाच वर्षे आपल्याला कसं मिळवता येईल? आणि लोकांना, नागरिकांना कसं भुलवता येईल. यासाठी ही नौटंकी किंवा सगळी शो-बाजी आहे. मात्र, पब्लिक है ये सब जानती है.. पब्लिक ही शो बघायला येते. नगरपालिकेला नागरिकांची काही पडलेली नाही. साताराचे नागरिक या नौटंकीवर निवडणुकीनंतर शेवटचा एकदा पडदा टाकतील. अशी परिस्थिती आता साताऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे." असं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी म्हटले आहे.

Tags:    

Similar News