वीजबिल वसुलीसाठीची वीज कनेक्शन तोडणी बंद, अर्थमंत्र्यांची घोषणा

लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिलांच्या वसुलीबाबत विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Update: 2021-03-02 06:22 GMT

लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल वसुलीसाठी सुरू असलेली वीज कनेक्शन तोडणी तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीजप्रश्नी स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर उत्तर देताना जोपर्यंत विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील घरघूती वीजग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने राज्यभरात वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे.

लॉकडाऊनंतर राज्यभरातील कोट्यवधी ग्राहकांना वाढीव वीज बिल आले होते. हे लाईटबिल भरणे शक्य नसल्याचे सांगत अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्यास नकार दिला होता. पण जनतेचा रोष पाहून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत दिलासा दिला जाईल अशी घोषणा केली होती. पण त्यानंतर वीज बिल माफी करता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला होता. यानंतर राज्यभरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. तसेच भाजप आणि मनसेने या मुद्द्यावर तीव्र आंदोलमन देखील केले होते.

महावितरणची वर्षनिहाय थकबाकी

मार्च 2014-- 14154.5 कोटी

मार्च 2015 -- 16525.3 कोटी

मार्च 2016 -- 21059.5 कोटी

मार्च 2017-- 26333 कोटी

मार्च 2018-- 32591.4 कोटी

मार्च 2019-- 41133.8 कोटी

मार्च 2020- 51146.5 कोटी

डिसेंबर 2020-71,506 कोटी

Tags:    

Similar News