नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा: चंद्रकांत पाटील

Update: 2019-11-30 07:12 GMT

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले असल्याचा आरोप करत शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नाव घेतली हे बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह ६ जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्र्यांनी शपथ घेताना त्यांच्या पक्षातील नेत्यांची नावं घेतली. शपथ घेताना नेत्यांची नाव घेणं हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा. अशी मागणी पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे.

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली. हे बेकायदेशीर आहे. कायद्याप्रमाणे शपथ घेताना असं म्हणता येत नाही. त्यामुळे हा शपथविधी रद्द करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हे ही वाचा...

उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच

कॉंग्रेस राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम?

संजय राऊत यांच्या कसोटीचा दिवस

जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या २ दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असंही ते म्हणाले.

दरम्यान, नव्या सरकारने नियम धाब्यावर बसवले आहेत, नियमबाह्य काम करु देणार नाही, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून याचा विरोध करु, एवढचं नव्हे तर कायद्यानुसार कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होता येत नाही असं सांगत येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुनही भाजपा आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले.

Similar News