Coronavirus : उद्धव ठाकरे यांचं पद धोक्यात?

Update: 2020-04-05 05:16 GMT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना च्या लढाईत व्यस्त आहेत. मात्र, याच कोरोना व्हायरस मुळं त्याचं पद धोक्यात आलं आहे. कारण कोणत्याही व्यक्तीनं राज्यात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या व्यक्तीस ६ महिन्याच्या राज्यातील एका सभागृहाचं (विधानसभा किंवा विधानपरिषद) प्रतिनिधी म्हणून निवडून यावं लागतं.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं त्यांना ६ महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून यावं लागणार आहे. त्यांची ही मुदत २८ मे ला संपत आहे. त्यातच देशावर कोरोना व्हायरस चे संकट आले आहे. त्यामुळं आगामी काळातील देशातील सर्व निवडणूका पुढे ढकलल्या जात आहेत.

येत्या २४ तारखेला महाराष्ट्र आणि बिहारमधील विधान परिषदेच्या प्रत्येकी ९ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोना ची पार्श्वभूमी पाहता पुढं ढकलण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य होणार होते. मात्र, ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढं ढकलण्यात आल्यानं उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशात सध्या लॉकडाऊन असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं अवघड आहे. तसंच कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती पाहता या निवडणुकांची पुढील तारीख निश्चित करणंही शक्य नाहीए. विधान परिषदेच्या या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. अशा वेळी काय होऊ शकते? या संदर्भात भारतीय राज्य घटनेचे तज्ञ Adv असिम सरोदे यांच्याशी आम्ही बातचित केली असता त्यांनी…

उमेदवार स्वतः निवडणूक लढण्यास सक्षम आहे. मात्र, सध्या राज्यात तशी परिस्थिती नाही. राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मुदत वाढून देण्याची तरतूद घटनेत नाही. त्यामुळं राज्यपाल आणि निवडणूक आयोग ऑनलाईन मतदानाची प्रक्रिया पार पाडू शकतात. त्यासाठी त्यांना मतदान प्रक्रियेत बदल करावे लागतील. अलिकडे देशातील सर्वोच्च न्यायालयातील खटले देखील ऑनलाईन सुरु झाले आहेत.

यामध्ये दुसरा एक उपाय आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा तात्काळ शपथ घेणं हा एक पर्याय आहे. त्यामुळं त्यांना आणखी ६ महिने मिळतील. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्री होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र, असं केल्यास एक वेगळा पायंडा पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Similar News