Lakhimpur Kheri: केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार

लखीमपूर खेरी प्रकरणातील मोठी बातमी: केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार, मोदी आता तरी मंत्र्यांचा राजीनामा घेणार का?

Update: 2021-11-10 12:53 GMT

लखीमपूर खेरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलांच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याची माहिती फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार हिंसाचाराच्या वेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन बंदूकीतून गोळीबार झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळं मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्राचा मुलगा आशिष मिश्राच्या अडचणीत वाढ होणार आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी अंकित दासच्या बंदुकीची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याच्या देखील बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कुणालाही गोळी लागल्याचं म्हटलं नसलं तरी मात्र, पोलिस तपासात पोलिसांना वाहनांवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. त्या आधारे यांच्या बंदूकी जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान या रिपोर्ट नंतर आता "लखीमपूर खेरी हिंसाचारात न्याय मिळावा म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे.'' केंद्राच्या तीन नवीन शेती कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनांनी, लखीमपूर खेरी प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.

Tags:    

Similar News