जशोदाबेनचा मुद्दा राज्यसभेत : केतकरांचं 9 मिनिटांचं भाषण 6 मिनिटात गुंडाळलं

Update: 2019-07-30 03:21 GMT

पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांनी स्वतःला असुरक्षित वाटतं, या कारणासाठी आझाद मैदान मध्ये केलेलं आंदोलन असो किंवा त्यांच्या पासपोर्टचा मुद्दा, ही माहिती लोकांसमोर येऊ दिली गेली नाही. हुकूमशाही सरकारं विरोधी पक्षांच्या संख्येला नाही तर माहितीला घाबरतात असा आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला. या आरोपानंतर बोलण्यासाठी नऊ मिनिटांचा वेळ दिलेला असतानाही तालिका सभापतींनी बेल वाजवून केतकर यांना वेळे अभावी भाषण थांबवण्याची विनंती केली.

- राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे. -

माहिती अधिकाराचा कायदा संसंदेने आणला नाही. हा कायदा लोकांच्या मागणीवरून आलाय. अशा परिस्थितीत लोकांच्या चळवळीमुळे आलाय. भाजपाची जीव तोडून पाठराखण करणाऱ्या अण्णा हजारेंपासून अरूणा रॉय तसेच उतर कार्यकर्त्यांनी यासाठी लढा दिलाय.सरकार माहिती दडवतंय असं वाटत असल्याने लोकांनी हा लढा दिला आणि युपीएने हा कायदा मंजूर केला, मग आताच सरकारला माहिती अधिकाराची अडचण का होतेय? असा सवाल ही केतकर यांनी आपल्या भाषणात केला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या अनेक लोकांना आपण कसं निवडून आलोय याचाच धक्का बसला आहे. त्यामुळे निवडणूक काळात आपण काय काय हेराफेरी आणि घोटाळे केले हे लोकांसमोर येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. या काळात ईव्हीएम ( EVM ) वर प्रश्न उपस्थित केले गेले आणि निवडणूक आयोग संशयाच्या धुक्यात सापडलंय. आता जर योग्य माहिती सर्व पक्ष आणि लोकांना मिळाली तर या सरकारला आव्हान निर्माण होऊ शकतं, असं ही केतकर म्हणाले.

कपिल सिब्बल यांनी 3.5 लाख कोटी रूपयांच्या बनावट नोटा कशा चलनात आणल्या याबाबतची माहिती प्रसारित केली, पण मुख्यप्रवाहातील माध्यमांनी अवघ्या 2-4 मिनिटं बातमी दाखवल्यानंतर ही बातमी थांबवली. ही माहिती सोशल मिडीयावरून प्रसारित झाली. माध्यमांवर नियंत्रण आणलं गेलं. जर अशी माहिती विरोधी पक्षाच्या ताब्यात आली तर सरकार संकटात येईल, त्याच बरोबर या देशाची निवडणूक प्रक्रीयाच संकटात येईल.

मला आज एक मुद्दा मांडायचाय, जो कदाचित विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष किंवा कुणालाच आवडणार नाही. कारण हा मुद्दा संसदेच्या बाहेरचा आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधानांच्या पत्नीने येऊन आंदोलन केलं. त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेबद्दल हे आंदोलन होतं. त्यांना असुरक्षित का वाटतं याबाबतच्या बातम्या काही ठराविक गुजराती आणि इंग्रजी माध्यमांमध्ये आल्या. माहिती आयुक्तांना ज्यावेळी प्रश्न विचारला गेला की पंतप्रधानांच्या पत्नीलाच असुरक्षित वाटतंय, त्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर ही माहिती फेटाळली गेली. कुमार केतकरांनी जशोदाबेन यांचा मुद्दा काढताच तालिका सभापतींनी सहाव्या मिनिटालाच बेल वाजवून तुमच्याच पक्षांच्या इतर लोकांना बोलायचं असं सांगितलं. तरी सुद्धा केतकरांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. जशोदाबेन यांना पासपोर्ट ही नाकारला गेला. या अन्यायाची माहिती ही बाहेर येऊ शकली नाही. हा मुद्दा कुणीच बाहेर काढला नाही, असा आरोप ही केतकर यांनी केला.केतकरांच्या या आरोपांनंतर तालिका सभापतींनी केतकर यांना भाषण थांबवायला सांगितलं.

अशा पद्धतीचं हुकूमशाही सरकार माहितीला घाबरतं. त्यामुळे माहिती दडपण्याचा प्रयत्न करतं असा आरोप ही केतकर यांनी केला आहे. लोकसभा किंवा राज्यसभेत विरोधी पक्षाचे किती सदस्य आहेत याला हुकूमशाही सरकारं घाबरत नाहीत, पण माहिती हे प्रभावी शस्त्र असल्यानेही सरकारं अशा शस्त्रांना घाबरतात, RTI नक्की हेच काम प्रभावीपणे करत होतं असं ही केतकर आपल्या भाषणात म्हणाले.

Similar News