संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?- संजय राऊत

Update: 2021-01-08 08:04 GMT

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादंग माजला असताना सामनापाठोपाठ खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेचे समर्थन करत संभाजी महाराजांचे नाव वापरणं गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर केल्यानंतर महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल दुरुस्ती करु अशी भुमिका घेतली होती. आज सामनातून या भुमिकेचे समर्थन केले आहे.

संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना "सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं, लोकभावनेवर चालतं" असं म्हटलं आहे. सरकारी ट्विटरवर औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं वापरण्यात आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेनं सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचं असेल ते सामनामध्ये लिहावं असं म्हटल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे.

राऊत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं चालतं आणि सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचं नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणं हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालतं" नाशिकमधील भाजपाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Tags:    

Similar News