भारतातील मंदी ही तात्पुरती असून हळूहळू परिस्थिती सुधारेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF)प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं पहिल्या टप्प्यातला करार झाल्यामुळे आता परिस्थितीत सुधारणा होईल असा दावाही त्यांनी केलाय. जागतिक आर्थिक विकासाचा दर खूपच कमी असून तो सुधारण्यासाठी आक्रमकपणे आर्थिक सुधारणा राबवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने २०१९-२० या वर्षासाठी भारताचा विकासदर ४.८ टक्के राहील असा अंदाज याआधी वर्तवला आहे. तर जागतिक मंदीमध्ये भारतातील आर्थिक मंदीचा वाटा असल्याची टीका आयएमएफच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर क्रिस्तालिना जार्जिव्हा यांनी व्यक्त केलेला विश्वास मोदी सरकारसाठी थोडासा दिलासादायक आहे.