Covid vaccination : लसीकरण सक्तीचे करा, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

Update: 2022-01-14 13:41 GMT

जालना :  ओमायक्रॉन व्हेरियंटने राज्याचे टेन्शन वाढवले आहे. त्यातच राज्यात दररोज कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र काही लोकांचा लसीकरणाला विरोध आहे. त्यामुळे 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी लस सक्तीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे लेखी निवेदन केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

देशात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थिती नव्हते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारतर्फे पंतप्रधानांना निवेदन दिले. तर त्यावरून राजेश टोपे जालना येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, गुरूवारच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन संदर्भात काहीही सांगितले नाही. मात्र लॉकडाऊनबाबत समान नियम निकष असावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तर आरोग्य सुविधा मजबूत करणे, लसीकरण वाढण्याबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्या. याबरोबरच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जेवढे निर्बंध टाळता येतील ते टाळा असे आवाहन पंतप्रधानांनी राज्य सरकारांना केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही. तर लोकांनी राज्य सरकारने जाहीर केलेले कोरोना नियम पाळावेत असे आवाहन यावेळी केले.

याबरोबरच केंद्र सरकारने ECRP2 चा निधी खर्च करण्याबाबत टाकलेल्या किचकट अटी शिथील करण्याबाबत राजेश टोपे यांनी विनंती केली. तर केंद्र सरकारने नव्या व्हेरियंटबाबत ट्रीटमेंट प्रोटोकॉल जारी करण्याची मागणीही यावेळी केली. तर सध्या मोठ्या प्रमाणात होम टेस्ट कीटच्या माध्यमातून कोरोना चाचणी केली जाते. मात्र त्या रुग्णांची माहिती सरकार दफ्तरी येत नाही. त्यामुळे कोरोना बाधित असलेल्या रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली तर त्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे शक्य व्हावे. यासह पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सरकारकडे होण्यासाठी केंद्र सरकारने मार्ग काढण्याची विनंती पंतप्रधानांकडे केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, लसीकरण ऐच्छिक असल्यानेच मोठ्या अडचणी येत आहेत. याबरोबरच काही लोक लस घेण्यास विरोध दर्शवत आहेत. त्यांचे घर घर दस्तक या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत लसीकरण सक्तीचे करता येईल का? याबाबत केंद्र सरकारला लेखी निवेदन केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी 50 लाख कोविशिल्ड तर 40 लाख कोव्हॅक्सिन लसींची मागणीही यावेळी करण्यात आली. तर मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाचा मंदावलेला आहे. मात्र याच वेगाने लहान मुलांचे लसीकरण केले तरी 15 दिवसात लसीकरण पुर्ण होईल, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तर राज्याचा आरोग्य विभाग कोरोनाचे म्यूटेशन होऊ नये यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या कोणत्याही म्युटेशनला सामोरे जाण्यास राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. 

Tags:    

Similar News