दरड कोसळण्याचा अंदाज प्रशासनाला नसेल तर मग ते कसलं प्रशासन - राज ठाकरे

Update: 2023-07-20 11:47 GMT

खालापूर - रायगड येथील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, "रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत हीच इच्छा आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असून आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असाही सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


Tags:    

Similar News