येवल्यात वरूणराजचा कहर...उभ्या पिकांमध्ये पाणीच पाणी

Update: 2021-09-29 05:30 GMT

येवला : येवला शहरासह तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून या पावसामुळे पिकांमध्ये पाणीच पाणी साचले असून शहरातील अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

येवला शहरासह परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील बंधारे ,नदी ,नाले तुडूंब भरून वाहू लागले आहे .तर बळीराजाने मोठ्या कष्टाने शेतात पिकवलेल्या मिरची, मका, बाजरी, सोयाबीन या उभ्या पिकात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे होत असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात दिसत आहे.

तर शहरातील साईबाबा मंदिरा मागील परिसर तसेच बुरुड गल्ली या भागातील रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने सर्व सामान भिजले गेले आहे .तसेच शनि पटांगण, गणेश मार्केट परिसरात नाल्याचे  पाणी आल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटला गेला आहे. येवला- नगरसुल रोडवरील वरील भामनाला नदीला पूर आल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती तसेच येवला- भारम रस्त्यावरील नागडे गावातील नारंदी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे.

पावसाच्या संततधारेमुळे शहरातील अमरधाममध्ये प्रवेश करणाऱ्या रोडवर पाणीच पाणी असल्याने काल शहरातील एका कुटुंबातील व्यक्तीचा अंत्यविधी झाला होता .आज  अस्ती आणण्याकरिता जात असताना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून जाण्याची वेळ या कुटुंबावर आली. तर अमरधाम मध्येही पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.येवला शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने

शहरातील आंबेडकर नगर येथे घराची भिंत अंगावर पडून सोनाली भालेराव ही महिला जखमी झाली आहे. घरातील लोकांनी त्वरित महिलेस ओढल्यामुळे तिचा जीव वाचला असून तिच्या हाताला दुखापत झाली आहे.

Tags:    

Similar News