महाराष्ट्र झालं आता तामिळनाडूच्या राज्यपालांचा नवा खेळ...

Update: 2023-01-10 09:13 GMT

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सोमवारी तामिळनाडू विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यपाल आरएन रवी यांनी विधानसभेत सांगितले की, राज्याचे नाव तामिळनाडूऐवजी तमिझगम ठेवणे चांगले होईल. यावर सत्ताधारी द्रमुक, मित्रपक्ष काँग्रेस आणि विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके) च्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. गदारोळ झाल्यानंतर राज्यपाल भाषण मध्येच सोडून सभागृहाबाहेर गेले. काँग्रेस, द्रमुकसह व्हीसीकेने सभागृहात राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजप आणि आरएसएसची विचारधारा राज्यात लादू नये असेही ते म्हणाले.

राज्यपाल भाजप अध्यक्ष म्हणून काम करत आहेत..

राज्यपाल रवी यांनी भाजपचे दुसरे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणे थांबवावे, असे द्रमुकचे खासदार टीआर बाळू म्हणाले. गोंधळ, फूट आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी ते दररोज वादग्रस्त टिप्पणी करतात. ते म्हणाले की, राज्यपाल म्हणतात की द्रविडीयन पक्षांनी 50 वर्षांच्या राजकारणात जनतेची फसवणूक केली आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. हे त्यांनी राजभवनातून नव्हे तर भाजपचे राज्य मुख्यालय असलेल्या कमलालयममधून सांगावे अशा कडक शब्दात त्यांनी राज्यपालांचा निषेध केला आहे..

ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याचे विधेयक रखडल्याचा आरोप

ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याचे विधेयक राज्यपालांनी अद्याप मंजूर केले नसल्याचा आरोप विधानसभेत द्रमुकच्या आमदारांनी केला. राज्यात अनेक विधेयकांवरून द्रमुक आणि राज्यपाल यांच्यात वाद सुरू आहे. यामध्ये ऑनलाइन जुगार आणि रमी बेट्स सारख्या ऑनलाइन गेमवर बंदी घालणे समाविष्ट आहे. यामुळे डिसेंबर 2022 पर्यंत राजभवनाकडे 21 बिले प्रलंबित होती.

महाराष्ट्रात देखील होतीये राज्यपाल हटावची मागणी..

विरोधक ज्या प्रकारे तामिळनाडू मध्ये राज्यपालांवर टीका करत आहेत अगदी अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली यादी राज्यपालांनी मंजूर केली नाही. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला. त्यामुळे राज्यपाल निष्पक्ष नसून भाजपचे काम करता असा आरोप सातत्याने होत आला आहे..

Full View



महापुरुषांच्या अवमानावरून राज्यपालांवर जोरदार टीका...

तामिळनाडू मध्येच नाही तर अनेक राज्यात एकंदरीत अशीच काही परिस्थिती आहे. महाराष्ट्रात राज्यपाल हटाव म्हणून अनेकदा मोर्चे, आंदोलने झाली आहेत. कोश्यारी यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रात अनेकवेळा गदारोळ झाला आहे. १९ नोव्हेंबरला औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आयकॉन म्हटले होते. कोश्यारी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नव्या युगाचे प्रतीक असल्याचे त्यांनी मेळाव्यात सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात केली. भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटानेही कोश्यारी यांच्या विधानाला विरोध केला. असे अनेक वादग्रस्थ विधाने राज्यपालांनी केली आहेत.

तर अशा प्रकारे सध्या अनेक राज्यात राज्यपालांविषयी परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं ज्याप्रकारे आता विरोधक तामिळनाडू व महाराष्ट्रात राज्यपालावर ते निष्पक्ष काम करत नसल्याचा आरोप होतो आहे तो योग्य आहे का? राज्यपाल भाजपची भूमिका घेऊन या पदाचा गैरवापर करत आहेत का? भाजप राज्यपाल या पदावर मर्जीतील लोकांची नेमणूक करून दबावतंत्र निर्माण करत आहे का...? 

Tags:    

Similar News