'त्या' 12 आमदारांच्या नावांचा प्रस्ताव, भाजपचा गौप्यस्फोट

राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. पण आता भाजपने याबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने या वादाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

Update: 2021-06-02 12:17 GMT

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांकडून सरकारची अनेक मुद्द्यांवर कोंडी केली जात असल्याचा आरोप होतो आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. आता भाजपने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुख्यमंत्री सचिवालयाने वेगळीच माहिती दिल्याचे म्हटले आहे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

"त्या 12 आमदारांचा प्रस्ताव विचाराधीव मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदां अंतर्गत उत्तर.

प्रश्न होता- प्रस्ताव कधी पाठवला, कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे, मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?"

असा सवालच उपाध्ये यांनी विचारला आहे.

आणखी एक ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. @someshkolge यांनी ही माहिती #RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा पूर्वी ठरलेली नावं बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का ?

याआधी सर्व सत्ताधारी नेत्यांतर्फे राज्यपालांनीच सरकारने सुचवलेल्या नावांचा प्रस्ताव रोखून धऱल्याचा आरोप केला आहे. पण आता भाजपच्या या दाव्याने 12 आमदारांच्या प्रश्नावर राज्याचे राजकारण तापणार हे निश्चित आहे.

Tags:    

Similar News