मुंबईत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाच्या पुनरावृत्तीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात एका महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे, नागपूर, पालघर यासारख्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. महिलांसाठी सुरक्षित शहर असा मुंबईचा लौकीक या घटनेमुळे धोक्यात आला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचा खटला स्वतंत्र फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
पोलीस दलाचे मनोधैर्य खचले – फडणवीस
अशा घटनांमुळे पोलीस दलात काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याने सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. पण या बदल्यामुळे पोलीस दलाचं मनोधैर्य कोसळलं असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. बदल्यांमध्ये अनेक चांगल्या अधिकाऱ्यांना डावलंलं गेल्याने याचा विपरित परिणाम झाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं मनोधैर्य वाढलंय, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.