'महिनाभरात लाभार्थ्यांना घरे द्या अन्यथा तयार घरांचा ताबा घेऊ'; प्रकल्पग्रस्तांचा इशारा
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्पग्रस्त घरांसाठी वंचित असल्याचा म्हणत महानगरपालिकेकडून प्रकल्पग्रस्त बाधितांना घरे दिली नाहीत तर तयार घरांवर ताबा मिळवणार असल्याचा इशारा गोविंदवाडी बायपास प्रकल्पग्रस्त बाधितांकडून देण्यात आला आहे.
कल्याण येथे प्रकल्पग्रस्त बाधित नागरिक गेल्या दहा वर्षांपासून घराच्या अपेक्षेत आहेत. गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतील हजारों घरे कल्याणमध्ये तयार असून पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांना आजही घरांपासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
कल्याण पश्चिम पालिका क्षेत्रात येणारी जुनी गोविंदवाडी रस्ता रुंदीकरणात तेथील शेकडों नागरिकांच्या राहत्या घरांवरून महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आल्याने येथील रहिवाशी रस्त्यावर आली आहेत. प्रकल्पग्रस्त बधितांना नवीन घरे देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांकडून देण्यात आले होते. मात्र या घटनेला तब्बल दहा वर्षे उलटून गेली तरी नवीन घरांचे आश्वासन कागदावरच राहिल्यामुळे येथील नागरिकांमध्ये महापालिका विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पात्र ठरवण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांना पालिका प्रशासन आजही नव्या घरांचा ताबा देण्यास असमर्थ ठरलेली आहे. परिणामी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकल्पग्रस्त नागरिकांना सात वर्षांपूर्वी घरे मिळण्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र तब्बल दहा वर्षे उलटूनही बाधितांना घरांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोना काळ असल्यानं गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पबाधित नागरिकांना आता भाड्याने राहत असलेल्या घराचे भाडेही देणे जमत नसल्याने प्रकल्पग्रस्त लाभार्थी पालिका प्रशासनाविरोधात बंड पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे.
तर याबाबत निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेने ही आक्रमक भूमिका घेऊन वारंवार पालिका प्रशासनाला पत्र व्यवहार करुन देखील कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने दहा दिवसात पालिका प्रशासनाने घरे दिले नाही तर स्वतः घरात घुसून लाभार्थ्यांना घरे मिळून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.