गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळं चमत्कार, मुंबईच्या महापौर तावडेंच्या वक्तव्यावर जोरदार चर्चा
मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असं वक्तव्य रितू तावडे यांनी केलं आहे.
Mumbai Mayor Ritu Tawde : सध्या राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. तंत्र-मंत्र तसेच जादू करण्याचे आश्वासन देऊन महिलांना जाळ्यात ओढायचा. आतापर्यंत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील त्याच्यासोबत व्हायरल झाले आहेत. अशातच मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गुरुदेवजींच्या चमत्कारामुळेच माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, असं वक्तव्य रितू तावडे यांनी केलं आहे. महावीर जयंती निमित्त बोरीवली कोरा केंद्र मैदानात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाल्या रितू तावडे?
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मला घशाची समस्या होती. मी गुरुजींना सांगितले की आवाजाची समस्या आहे. मी औषधं घेत आहे. परंतु काहीही फरक परत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी आशीर्वाद दिला आज मी स्पष्ट बोलत आहे. हा मोठा चमत्कार असल्याचे वक्तव्य महापौर रितू तावडे यांनी केलं आहे. आज माझा आवाज तुम्ही ऐकत आहात. खूपच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळत आहे असे रितू तावडे म्हणाल्या. भगवान महावीर यांचा अहिंसेचा मार्ग आपल्याला दिसत आहे. दीड वर्षांपासून मी ज्या घशाच्या समस्येने त्रस्त होते, पण गुरुजींनी आशीर्वाद दिल्याने मी आज तुमच्यासमोर असं बोलू शकत असल्याचे तावडे म्हणाल्या. दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.