गाडगे महाराज जयंती विशेष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज

Update: 2020-02-23 07:15 GMT

आज एका अशा महाराजांची जयंती आहे की, ते नियतीला पडलेलं कोडं ठराव! कारण ते महाराज कीर्तनकार होते. पण ते "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका असं सांगायचे, शिकलेले नव्हते. मात्र, शिक्षणाचे महत्त्व आपल्या किर्तनातून सांगताना अडाणी राहू नका, असा संदेश द्यायचे. सावकाराचे कर्ज काढू नका असं म्हणत आर्थिक बाबतीत सजग राहण्याचे ज्ञान द्यायचे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वत: गावाची स्वच्छता करायचे... अशा संत गाडगे महाराजांची आज जयंती...

"बाप हो,,,,,

पैसे नसेल तर जेवणाचे ताठ मोडा,

हातावर भाकरी खा,

बायकोले लुगडे कमी भावाचे घ्या,

पण मुलाले शाळेत घातल्या शिवाय राहू नका,"

असा संदेश देणारे संत गाडगे बाबा!

डोक्यावर झिंज्या, त्यावर खपराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके, असा पेहराव असणारा संत समाजाला उपदेश करत राहिला, संत कबीर आणि संत रोहिदास यांच्या विचारांची परंपरा चालवणारा हा महामानव, हिंसा बंदी, दारुबंदी, पशुबळी प्रथा निवारण, अस्पृश्यता निवारण करत राहणारा या संताने, दीन, दलित, अपंग आणि पिढीतांच्या सेवेमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य अर्पन केलं.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर तर ते खूपच आनंदी होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावर ते लोकांना मदतीचे आवाहन करायचे.

बाबासाहेब माझे गुरू होऊ शकतात असे बोलायचे, मी न शिकलेला माणूस, रस्त्यावर उतरून लोकांना चांगल सांगणारा पण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार देणारा माणूस अशी पोहोच पावती ते द्यायचे. तुफानातील दिवे या कथासंग्रहात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्यातील भेटीचा एक प्रसंग आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर ची एक सभा सुरु होती. तिथे गाडगे महाराज पोहचले… अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले. "बाबा तुम्ही खाली का उभे? वर या ना." "नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या." "बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन" "नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या." बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते.

बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले. "बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..? त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले." बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.'' गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.

"आता तुमचे चालू द्या." असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर... संतांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य... स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे. तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे.

लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा. पण बाबासाहेब मात्र, खालीच बसायचे. ‘जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही. ''स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही. परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या १४ दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील? याची जाणीव यातून होते.

संत गाडगे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला पंढरपूर येथील धर्मशाळा उपलब्ध करुन दिली होती. स्वत: एकही दिवस शाळेत न जाणाऱ्या संत गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्व समजले होते. आजही गाडगे महाराजांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरणारे आहेत.

सामान्य जनता त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गर्दी करीत असे. आपल्या रसाळ वाणीने आणि रोकड्या उपदेशाने भल्या भल्या धर्म प्रमुखांनी त्यांच्या समोर तोंडात बोटं घातली. ते कीर्तनाला उभे राहिले की, लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवाहन करत

"लोकहो...

देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही,

दरिद्री नारायणाच्या रूपाने

तो तुमच्या समोर उभा आहे,

दीन दुबळ्यांच्या डोळ्यातील एक अश्रू पुसला की, देवाला एक अभिषेक घडतो हो..."

असे प्रवचन ते करायचे, खरं तर गाडगे महाराज हे "संतांमधील सुधारक आणि सुधारकामधील संत होते" .

आजच्या पिढीतील काही संताची किर्तन ऐकल्यानंतर वैज्ञानवादी, गोरगरीबांच्या प्रश्नावर, आरोग्यावर, आर्थिक परिस्थिती वर बोलणारे किर्तनकार दुर्मिळ होते आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.

Similar News