कोरोना काळात लोकसभेचं अधिवेशन होऊ शकत तर विधानसभेचं का नाही?: देवेंद्र फडणवीस

Update: 2021-02-18 12:43 GMT

Courtesy -Social media

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार यंदाचं अधिवेशन कमी काळात आटोपण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात लोकसभेचं अधिवेशन सुरळीत चालू शकतं तर विधानसभेचं अधिवेशनही चालू शकतं. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायलाच हवं. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला तर, राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याचं स्पष्ट होईल. असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव...

दरम्यान, संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरणावरून विचारणा केली असता, संजय राठोड यांच्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याच्या टीकेचा फडणवीसांनी यावेळी पुनरुच्चार केला.

'सरकार राठोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा पोलिसांवर पूर्ण दबाव आहे. या प्रकरणात समोर आलेले पुरावे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळत नाहीत. या प्रकरणात तर पोलिसांकडे आयतेच पुरावे आहेत. पण कारवाई शून्य आहे. पोलीस सरकारच्या दबावाखाली काहीच करत नाहीयेय. 'इथे नो वन किल्ड जेसिका' सिनेमासारखी परिस्थिती दिसते आहे', असं ते म्हणाले.

Tags:    

Similar News