महाविकास आघाडीत बिघाडी, रायगडमध्ये पालकमंत्री हटाव शिवसेनेचा नारा

राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी रायगडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होऊन शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे.

Update: 2022-02-11 05:23 GMT

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तर सरकारने दोन वर्षांचा कालावधी पुर्ण केला आहे. मात्र रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. तर रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीत कुरबुरी वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांची पालमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी रायगड जिल्ह्यात वारंवार शिवसेना, व राष्ट्रवादी यांच्यात या ना त्या कारणाने संघर्ष दिसून येतो. त्यातच शिवसैनिक व आमदारांच्या मनात पालकमंत्री आदिती तटकरें यांच्याविरोधात असलेली नाराजी वारंवार समोर येत आहे. अशातच जिल्ह्यात आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, खालापुरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे मनमानी करत असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले यांनी यावेळी दिली. तर विविध विकासकामांचे श्रेय घेण्यावरून वाद सुरू झाला आहे. तर नगरपंचायत निवडणूकीदरम्यान राष्ट्रवादीने जिल्ह्यात आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोणीही पालकमंत्री चालेल पण आदिती तटकरे नको, असे म्हणत आमदार भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News