Media War: आता 'टाईम्स-नाऊ'च्या विरोधात 'रिपब्लिक' उच्च न्यायालयात

प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता लयाला जात असताना आता मिडीयाअंतर्गत Media War सुरु झाले आहे. टाईम्स नाऊ- न्युजलॉंड्रीचा खटला चर्चेत असताना आता बेजबाबदार पत्रकारीता करणारे अर्णब गोस्वामीचं रिपब्लिक चॅनेलने टाईम्स नाऊच्या नविका कुमारला टार्गेट करत दिल्ली उच्च न्यालालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

Update: 2021-02-11 10:41 GMT

टीआरपी घोटाळ्यासंबंधी व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात रिपब्लिक टीव्हीविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी एआरजी आउटलेटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीची दखल दिल्ली न्यायालयाने आज घेतली आहे.

सत्ताधाऱ्यांची तळी उचलणाऱ्या प्रसारमाध्यमांना गोदी मिडीया संबोधण्यात येतं. टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक दोन्ही चॅनेल्स सरकार आणि भाजपधर्जिनी आहेत. महाराष्ट्रात टिआरपी घोटाळा उघड झाल्यानंतर टाईम्स नाऊनं रिपब्लिकला टार्गेट करुन जाहीर कार्यक्रमातून अर्णब गोस्वामीच टिआरपी घोटाळ्याला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे रिपब्लिक टिव्ही सुरु होण्यापूर्णी अर्णब गोस्वामी टाईम्स नाऊमधे कार्यरत होते. न्युज अवर हा टाईम्स नाऊचा कार्यक्रम रिपब्लिकनं चोरल्याचा आरोप असून याबाबत कोर्टात केस सुरु आहे.

पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी चंदर जितसिंग यांनी आता रिपब्लिकनं टाईम्सनाऊच्या विरोधात दाखल केलेली याचिका दाखल करुन संबधिताना नोटीस जारी केली आहे.

नाविका कुमार यांनी टाईम्स नाऊ वाहीनीवर 18 जानेवारी 2021 एका कार्यक्रमात संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात विकृत आणि गैरसमज करणारी विधानेप्रसारित केल्यानंतर ही मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती.

अर्णब गोस्वामी यांची प्रतिमा बदनाम करण्याच्या हेतूनं टाईम्स नाऊच्या नाविका कुमार यांनी यांनी बेपर्वाईनं अत्यंत बदनामीकारक कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित करुन तो इंटरनेटवर प्रकाशित केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात गोस्वामी यांनी "राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणुन" आणि " राष्ट्रीय गुपित उघड " केलं असल्याचा आरोप कुमार यांनी ``निराधार दावे" केल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. नाविका कुमार यांनी प्रसारित केलेला कार्यक्रम व्यावसायीक वादातून बदनामी करण्यासाठी केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. एका बाजूला विश्वासार्हता घटत असताना प्रसारमाध्यमांमधील हे अंतर्गत युध्द कुठे घेऊन जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News