मॉब लिंचिंग विरोधात मोदींना पत्र लिहिणाऱ्या कलाक्षेत्रातील ४९ व्यक्तींच्या समर्थनार्थ आता १८५ कलाकार मंडळीही उतरली असून यात अनेक दिग्गज व्यक्तींचाही समावेश आहे.
सर्व कलाकार या प्रकरणात सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात आपल्या भावना व्यक्त करत आहेत. सोबतच सरकारची आलोचना करण्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा कसा नोंदवला जाऊ शकतो असा प्रश्नही सर्व स्तरातुन विचारला जात आहे.
तीन ऑक्टोबर रोजी बिहारमधील एका न्यायालयाच्या आदेशानुसार प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल, अडूर गोपालकृष्णन, मणिरत्नम, इतिहासकार रामचंद्र गुहा, गायिका शुभा मुद्गल, अभिनेत्री आणि निर्देशक अपर्णा सेन सहित ४९ दिग्गज कलाकारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या कलाकारांनी देशातील वाढत्या 'मॉब लिंचिंग' प्रकारणांविरोधात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.
'मॉब लिंचिंग' विरोधात पंतप्रधानांना पत्र लिहलं म्हणून देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणे आणि न्यायालयांचा गैरवापर करणं अशा सरकाराच्या मनमानी कारभाराविषयी दिग्गज कलाकार आवाज उठवताना दिसत आहेत.
यामध्ये अभिनेता नसीरुद्दीन शाह, लेखक नयनतारा सहगल, नृत्यांगना मल्लिका साराभाई, इतिहासकार रोमिला थापर, लेखक आनंद तेलतुम्बड़े, गायक टीएम कृष्णा आणि कलाकार विवान सुंदरम आदी कलाकार सहभागी झाले आहेत.