महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, ६४ वर्षीय रुग्णाचा मुंबईत मृत्यू

Update: 2020-03-17 06:14 GMT

सध्या महाराष्ट्रात कोरोनोचे 39 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दुबई वरून मुंबईत आला होता. देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहिती नुसार, कोरोनाची लागण झाल्याचं समजताच या रूग्णाला हिंदूजा रूग्णालयातून कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीवर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण इतरही आजाराने त्रस्त होता.

राज्यात कोणत्या जिल्ह्यात आढळले कोरोनाबाधित रुग्ण

पुणे 7

पिंपरी-चिंचवड 9

मुंबई 6

नवी मुंबई 3

ठाणे 1

पनवेल 1

कल्याण 3

नागपूर 4

यवतमाळ 3

अहमदनगर 1

औरंगाबाद 1

सरकारने कोरोनो व्हायरस ला रोखण्यासाठी घेतलेले निर्णय

· राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या.

· ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार.

· कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार.

· क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या.

· ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे. त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल.

· केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला.

· आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार.

· उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.

· नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी.

· होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

· धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.

Similar News