चीन कोरोनाग्रस्त, उल्हासनगरचं मार्केट ठप्प !

Update: 2020-02-21 13:26 GMT

उल्हासनगर शहराची ओळख ही आता एक मोठी बाजारपेठ म्हणून झाली आहे. इथं इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून ते फर्निचर, विविध शोभेच्या वस्तू स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण चीनमधल्या कोरोना व्हायरसचा फटका याच उल्हासनगरच्या बाजारपेठेला बसला आहे.

उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात चीनमधून माल येत असतो. चीनी वस्तू स्वस्त मिळत असल्याने या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याच इथले विक्रेते सांगतात. पण कोरोनो व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीननं निर्यात थांबवली आहे. त्यामुळे वस्तुंचा पुरवठा घटलेला आहे तर या वस्तुंच्या किमतीमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं काही व्यापारी सांगतात.

Full View

चीनमधल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका मोबाईल व्यवसायाला बसल्याचं काही व्यापारी सांगत आहेत. मोबाईलचे सुटे भाग चीनमधून येत असतात, पण हे सुटे भाग येणे सध्या बंद झाल्याने मोबाईल व्यवसायाला याचा फटका बसला आहे. चीनी ब्रँडच्या मोबाईलचे एजन्सी घेतलेल्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय ५० टक्क्यांवर आल्याचं ते सांगतात.

तर दुसरीकडे कोंबड्यांमध्ये या कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने चिकन विक्रेत्यांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यांचाही व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा हे व्यावसायिक करत आहेत. खरंतर भारतात कोणत्याही प्राण्याला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही, तसंच चिकनमधून तो धोकाही नाही हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय, तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केले आहे.

Similar News