महाराष्ट्रात सर्वदुर परतीच्या पावसानं थैमान घातलं असुन शेतकऱ्यांचं प्रंचड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अवस्था दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती पंरतु राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यासाठी ठिकठीकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलनं केली. यामुळे बाधीत क्षेत्रात तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे र्निदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून राज्यात आलेल्या प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत केली आहे.” असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सध्या बऱ्याच भागांत विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणं गरजेचं असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले आहेत.