उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांची गोची...?

Update: 2023-01-12 06:18 GMT

हटके कपड्यांमुळे समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद हिचे हेच हटके कपडे चित्रा वाघ यांना खटकले आणि त्यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. या वादात आपण जर पाहिलं तर चित्रा वाघ यांच्या प्रत्येक टीकेला उर्फी जावेदने त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. चित्रा वाघ सत्ताधारी पक्षात असून सुद्धा आजपर्यंत उर्फीला अटक होऊ शकलेली नाही.

त्यामुळे पोलीस उर्फीला अटक करत नाही असा हा थेट आक्षेप चित्रा वाघ यांनी घेतला. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यालाच त्यांनी थेट लक्ष केलं. त्यात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद या वादात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पूर्णतः कानाडोळा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे चित्रा वाघ या वादामुळे पक्षात एकाएकी पडल्या आहेत का? चित्रा वाघ यांनी हा वाद उकरून काढून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे का? 

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद हा वाद आता चांगलाच रंगत चालला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई व्हावी म्हणून चांगल्याच आग्रही आहेत. तर उर्फी देखील चित्रा वाघ यांना अगदी जशास तसे उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असं जरी असलं तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मात्र चित्रा वाघ यांच्या या वादावर मौन बाळगले आहे. त्यात काही दिवसांपूर्वी ''उर्फी जावेद हिने स्त्री म्हणून काहीही वावगे केलेले नाही'' असा निर्वाळा खुद्द अमृता फडणवीस यांनी दिला. अमृता फडणवीस यांनीच अशी भूमिका घेतल्यानंतर आता चित्रा वाघ आता नक्की काय करणार? चित्रा वाघ यांना आता हा वाघ आवरता घ्यावा लागणार का? तर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचं मौन आणि अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया पाहता असंच दिसतंय की, येत्या काळात चित्रा वाघ यांनाच या वादात माघार घ्यावी लागणार आहे.

काय आहे वाद..?

 उर्फी जावेद ज्या प्रकारचे कपडे घालते तिचा असा हा नंगाना चालू देणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. तिला अटक करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार देऊन त्यांनी केली होती. या सगळ्या दरम्यानच्या काळात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात जोरदार ट्विटरवॉर सुरूच होतं. या सगळ्या वादामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे? राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारून चित्रा वाघ यांना उर्फी जावेद हिचे कपडे हे महत्त्वाचे मुद्दे वाटतात का? असा खोचक सवाल सर्वसामान्य जनतेतून येऊ लागला. या वादात अनेकांनी उर्फी जावेदची बाजू घेतली.

त्यामुळे या सगळ्या वादात आता चित्रा वाघ यांनाच नमतं घ्यावं लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यात उर्फीने आज तागायत चित्रा वाघ यांना डिवचण्याचे सत्र सुरूच ठेवला आहे. तर या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चित्रा वाघ यांना या वादात माघार घ्यावी लागेल का? राज्यातील इतर महत्त्वाचे प्रश्न सोडून उर्फी जावेद हिच्यावर राजकारण करणं योग्य वाटतं का? उर्फी जावेद हिला डिवचून चित्रा वाघ यांनी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे का? 

Tags:    

Similar News