डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शालेय प्रवेश दिन 'राष्ट्रीय विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करा- राष्ट्रपती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश झालेला दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.

Update: 2022-02-12 14:01 GMT

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मुळ गावी सापत्निक भेट दिली. यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन 'राष्ट्रीय विद्यार्थी दिन' म्हणून साजरा करा, असे मत व्यक्त केले.

राष्ट्रपती दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रपतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव असलेल्या आंबडवे याठिकाणी भेट दिली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2015 सालापासून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय प्रवेश केलेला 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कारण 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा श्रीगणेशा केला. तर महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयक ओढ व निष्ठेचे स्मरण करून देण्यासाठी तो साजरा करणे आवश्यक आहे. त्यासाठी संसदेतील सदस्यांनी पुढाकार घ्यावा, त्याबाबत मी माझ्या परीने सहकार्य करील, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याशी संबधित पाच ठिकाणांना पंचतीर्थाचे नाव देऊन केंद्र सरकारने या सर्व ठिकाणी आदंराजली अर्पण करण्याची स्तुत्य पध्दत सुरु केली आहे. त्यांची जन्मभूमी, नागपूरची दीक्षा भूमी, दिल्लीचे परिनिर्वाण स्थळ, मुंबईची चैत्यभूमी आणि लंडन मधील आंबेडकर मेमोरियल होम या पाच ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्श मानणारे लोक श्रध्दाजंली अर्पण करतात. माझी केंद्र सरकरला अशी सूचना आहे की, याच मालिकेत बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथील स्मारकही तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावे आणि या गावाचे स्फूर्तीभूमी असे नामकरण करण्यात यावे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मोठा व्यासंग केला. आजच्या पिढीतही ही प्रवृत्ती निर्माण व्हावी, म्हणून या ठिकाणी उत्तमोत्तम पुस्तके असलेले ग्रंथालय निर्माण करण्याची सूचना राष्ट्रपतींनी स्मारकाला भेट दिल्यानंतर केली असल्याचे म्हटले होते. तर त्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. तर या उपक्रमात सहभाग म्हणून राज्यपाल निधीतून 30 लाख रुपये देण्याची घोषणा या उपक्रमामध्ये मी ही सहभागी होऊ इच्छ‍ितो. त्या दृष्टीने राज्यपालांनी राज्यपाल विवेकानुदान निधीतून 30 लाख रुपये देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात व सांगता पोलीस बँड पथकाने राष्ष्ट्रगीताची धून वाजवून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुप्रसिध्द निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले.या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, आंबडवे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते

Tags:    

Similar News