अतिवृष्टीने पीक खराब, ५ एकरावरील कापसावर फिरवले ट्रॅक्टर

Update: 2021-11-01 16:34 GMT

यंदा अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक खराब झाले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे निराश होऊन आपल्या ५ एकरातील शेतीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरला. विविध कारणांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. शेतातील कापूस निघण्याची वेळ आली असताना अतिवृष्टीने कहर केला, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरीना झालेला खर्च देखील निघाला नसल्याने भडगाव तालुक्‍यातील वडजी येथील शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतामधील कपाशी पिकावर रोटर फिरविला आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या हंगामात त्यांनी कपाशीची लागवड केली होती.

राबराब राबून पीक वाढविले. कपाशीला बोंड लागली. मात्र, अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे कपाशीच्या लागवडीपासुन ते आतापर्यंत झालेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकऱ्याने पाच एकर शेतातील कपाशीच्या पिकावर चक्क रोटर फिरवला आहे. या शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी बांधावर येऊन पाहणी केली नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने ठोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Tags:    

Similar News