दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Update: 2021-03-06 03:05 GMT

राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने अनेकत ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया लांबल्याने शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडले असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये साशंकता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत प्रश्न विचारल होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत.

कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. इतर मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक तयार केल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News