कोरोनामुळे जगभरात असमानतेला खतपाणी ; कैलाश सत्यार्थी यांचे मत

Update: 2021-12-07 02:50 GMT

'विकसित देशांमध्ये 64 टक्केचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. अशा देशांमध्ये दोनपैकी एका व्यक्तीने लस घेतली आहे. याउलट, निर्धन देशांमध्ये १२ पैकी एका व्यक्तीला लस मिळाली आहे. अशा प्रकारच्या असमानतेला जग नेहमीच तोंड देत आले आहे. कोरोनामुळे या असमानतेला खतपाणी मिळाले', अशी चिंता बालहक्क चळवळकर्ते आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली.

कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते 43 व्या जमनालाल बजाज पुरस्कार 2021 च्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. जमनालाल बजाज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्या दरम्यान गांधीजींच्या आदर्शांचे अनुसरण करून मानवतावादी व सामाजिक कार्य आणि विकासकामे केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 10 लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी जमनालाल बजाज फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर. ए. माशेलकर आणि इतर मान्यवर यांची उपस्थिती होती

यावेळी सत्यार्थी म्हणाले की, 'लहान मुलांचे शिक्षण, आरोग्य इत्यादी गोष्टींवर आपण खर्च केला नाही, तर 2022 च्या अखेरपर्यंत चार कोटी 60 लाख मुले बालमजुरीत ढकलली जातील,' अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. सध्या अडीच ते तीन कोटी मुले शाळेत परतणार नसल्याचे त्यांनी सांगितले. साधने, संसाधने अशा सर्वच गोष्टींचे जागतिकीकरण झाले. जगातील सर्वच नागरिक परस्परांवर अवलंबून आहेत. यशस्वी होणाऱ्या व्यक्तींच्या मागे अनेक कष्टकऱ्यांचे कष्ट असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. अशी भावना सत्यार्थी यांनी बोलताना व्यक्त केली.

Tags:    

Similar News