महारवाड्याची जागा वाचविण्यासाठी महिला रणरागिणी मैदानात

देशभर समानतेच्या गप्पा मारल्या जात असल्यातरी तळागाळात जातीय अत्याचार मात्र कमी झालेले नाहीत. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात गाव नकाशा वरील महारवाडा राखीव जागेवर अतिक्रमन करुन हक्क डावलण्याचे षडयंत्र रचले जात असताना बौध्द समाजाच्या महिलांनी जागेवर ताबा मिळण्यासाठी लढा उभारला आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2022-03-14 13:42 GMT

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील निगडे ग्रामपंचायत हद्दीतील महारवाडा राखीव जागेत अतिक्रमण होत असल्याची तक्रार येथील बौद्ध समाजाच्या वगीने महिलांनी रायगड जिल्हाधिकारी व पेण तहसीलदार यांच्याकडे केली आहे.याबरोबरच सदरच्या जागेवर लवकरात लवकर ताबा मिळावा अशी मागणी देखील करण्यात आलीय. महार वाड्याची जागा वाचविण्यासाठी महिला रणरागिणी मैदानात उतरल्या असून न्याय हक्कासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू असा निर्धार महिलांनी व्यक्त केलाय.


 



निगडे ग्रामपंचायत हद्दीत घेरी नदीच्या बाजूला मरीआई देवस्थानासमोर वनविभागाच्या बाजूला सरकार दप्तरी गट नं / स . नं . 48 मध्ये गावनकाशामध्ये महारवाडा अशी नोंद असलेली बौद्ध समाजाची सुमारे 3 ते 4 एकर जागा आहे . सदर जागेमध्ये काही वर्षापूर्वी झोपडया होत्या असे महिलांचे म्हणणे आहे. परंतु काही समाजकंटकांनी आम्ही कामधंदया निमीत्त बाहेरगावी असल्यामुळे सदर झोपडयांची नासधूस करून आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केलाय. काही व्यक्तींनी बौद्ध समाजाची कोणतीही परवानगी न घेता कोणताही करार न करता या जागेवर पक्की घर बांधली आहेत . त्यामुळे आमची हक्काची जागा असताना आम्ही बेघर झालो आहोत .




 



असा संताप महिलांनी व्यक्त केलाय. तसेच सदर ठिकाणी आम्ही आमच्या झोपडया / घरे बांधण्यासाठी गेलो असता काही व्यक्तींनी आम्हाला दमदाटी करून हाकलून लावले असल्याचे महिलांनी म्हटले आहे. सदर व्यक्तीविरोधात अनुसुचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंध कायदेनुसार कारवाई करून सदर जागा खाली करून ताबा मिळवून द्यावा अन्यथा आम्ही सर्व समाजबांधव आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय. महारवाड्याची जागा वाचविण्यासाठी पुकारलेल्या लढ्यात ललिता कांबळे,अंजना कांबळे, पुष्पा कुलकर्णी, जान्हवी कांबळे,मनीषा कांबळे, मालती गायकवाड, अश्विनी गायकवाड, अनुसया कांबळे, संगीता राणे, जनार्दन सोनावणे, कोमल कांबळे, जयश्री कांबळे, शोभा सोनावणे, मंगला कांबळे, अक्षधा कांबळे आदींसह महिला व समाज बांधव आपल्या हक्काच्या जागेसाठी लढत आहेत.




 


गावठाण हा पूर्व परंपरागत अधिकार आहे. पाणी, रस्ता, गटारे, शाळा, बाजार, खेळाचे मैदान वगैरे सर्व नागरी सुविधा असलेले गावठाण ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पूर्वापारपासून प्राप्त करून दिले जात होते. परक्या मोगल आणि आदिलशाही मध्ये ही पद्धत काय होती. मराठ्यांच्या राज्यात शिवाजीमहाराजांनी कित्येक नवी गावे वसवली आणि ही पद्धत दृढमूल केल्याचे इतिहास सांगतो. ब्रिटिश सत्तेच्या काळात हीच पद्धत चालू राहीली. खेडे गावातील प्रत्येक कुटुंबाला राहण्यासाठी हक्काची मोफत आणि सरकारी पट्टी नसलेली जागा उपलब्ध करून देण्याचा कायदेशीर हक्क स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवलेला आहे.



 


भूमिहीन मजूर आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आधी सूचित जाती, भटक्या जाती आणि इतर मागास प्रवर्ग या तीन व्यक्ती त्यांच्यासाठी झोपड्या आणि घरे बांधणे. गावठाण यांचा विस्तार आणि विहित करण्यात येतील अशा तत्त्वानुसार इमारतीचे नियमन करणे हे ग्रामपंचायतीचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडे सोपविलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी काही मोजलेल्या जमिनी वर्ग केलेल्या असतात या वर्ग करण्यात आलेल्या मोजलेल्या भूमापन क्रमांकाचे गट नकाशे ग्रामपंचायतीने स्वतःचे प्रॉपर्टी चे रक्षण करण्यासाठी ते दप्तरी ठेवणे आवश्यक ठरते. परंतू पेण तालुक्यातील निगडे येथील पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौद्ध समाजाच्या असणाऱ्या आरक्षित गावठाण जागेवर सवर्ण समाजाकडून अतिक्रमण झाले असल्याची तक्रार येथील बौद्ध समाजाने केली आहे. अशा प्रकारचे अतिक्रमण ही धक्कादायक बाब असून त्याविरोधात निगडे ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा प्रशासन कारवाई कधी करणार असा सवाल येथील बौद्ध ग्रामस्थ करीत आहेत आणि या बेकायदेशीर पणे करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे येथील बौद्ध महिला प्रतिनिधी सांगत आहेत.




 


सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी तहसीलदार यांना यासंबंधी प्रचलित शासन निर्णय, परिपत्रके नियम, व अधिनियमातील तरतुदी नुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.आता तहसीलदार यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

निगडे ग्रामपंचायत सरपंच सौ. कल्पना म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की सदरची जागा महारवाडा राखीव क्षेत्र असून त्या जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, लवकरच या जागेची सरकारी मोजणी केली जाईल. शिवाय या जागेवर पूर्वापार वास्तव असणे अथवा काही पुरावे तपासून पुढील निर्णय घेतला जाईल असे सरपंच म्हात्रे यांनी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News